अवकाळी पावसामुळे वेळ नदीला पूर   

वीज पडल्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान

मंचर,(प्रतिनिधी):  पेठ तालुका आंबेगाव येथे चार-पाच दिवसांपासून अवकाळी पाउस पडत आहे. चार दिवसांपूर्वी उन्हाळ्यामध्ये कोरडी ठाक असणारी वेळ नदी वाहू लागली. एकीकडे पावसामुळे शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार असला तरी अनेक ठिकाणी वीज पडल्यामुळे घरातील इलेक्ट्रिक साहित्याचे नुकसान झाले आहे.
 
पेठ येथील भाजी बाजार तळाशेजारील अशोक विठ्ठल राक्षे यांच्या घराच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या खोलीवर विजेचा लोळ घराचा पत्रा फोडून भिंतीमध्ये घुसला. झालेल्या घटनेत सुदैवाने घरातील खोलीच्या एका कोपर्‍यात हा विजेचा लोळ कोसळल्याने राक्षे कुटुंबीय भयभीत झाले.परंतु सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र या घटनेत घरातील इलेक्ट्रिक फिटिंग, टीव्ही, फ्रीज, फॅनसह इलेक्ट्रिक साहित्य निकामी झाले. अशोक राक्षे यांचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या घराशेजारी असलेले संतोष भालेराव यांचा टीव्ही जळून खाक झाला. त्यांचे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले. पीडीसी बँकेचे एटीएम विजेच्या धक्क्याने बंद पडले. नक्की एटीएमचे किती नुकसान झाले हे एटीएम दुरुस्त करणारे टेक्निकल इंजिनिअर आल्यानंतरच कळणार आहे, असे बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेश चपटे यांनी सांगितले. बँकेच्या शेजारी असलेले वाकेश्वर झेरॉक्स या दुकानातील इन्वर्टर बॅटरी, वाय-फाय राऊटर जळून गेले. 
 

Related Articles