नाशिकमध्ये अपघातात मायलेकींसह कुटुंबातील चार ठार   

नाशिक: कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा येथे मंगळवारी रात्री उशीरा एक हृदयद्रावक अपघात घडला. नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली मोटार  भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. या अपघातात नामपूर येथील भदाणे कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
ही दुर्घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. कारचा वेग प्रचंड होता आणि वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा ताबा सुटल्यामुळे कार थेट विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या संरक्षक बीमवर आदळली. या भीषण अपघातात गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला.अपघातानंतर कळवण, मानूर, व कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि काही क्षणातच ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात हलवले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.
 
मृतांमध्ये शैला वसंत भदाण (वय ६२), सरला भालचंद्र भदाण (वय ५०), चालक खालिक मेहमूद पठाण (वय ५०), माधवी मेतकर (वय ३२) आणि त्रिवेणी मेतकर (वय ४) यांचा समावेश आहे. भालचंद्र भदाण (वय ५२) आणि उत्कर्ष मेतकर (वय १२) गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिकला हलवले आहे. अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शैला भदाण आणि माधवी मेतकर या मायलेकी होत्या. त्रिवेणी ही माधवीची मुलगी होती.
 
अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. "कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे," असे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
 

Related Articles