लोखंड, स्टीलचे भाव गगनाला भिडल्याने शेतकर्‍यांची कुडाची कांदा चाळ बनविण्यास पसंती   

बेल्हे,(प्रतिनिधी) : लोखंड व स्टीलच्या वाढत्या महागाईमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा कुडाची पारंपरिक कांदा बराख करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. लोखंड व स्टील यांचे भाव वाढल्यामुळे शेतमालाच्या पडल्या बाजारभावामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले कांदा उत्पादक शेतकरी लोखंडी कांदा चाळ उभारू शकत नाहीत. यावर उपाय म्हणून आळे, राजुरी, बेल्हे, आणे, नळवणे, पेमदरा, पारगाव, मंगरूळ, लवणवाडी येथील कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणुकीसाठी जुन्या पद्धतीच्या कुडाच्या आरणी तयार करून त्यात कांदा साठवणूक करीत आहेत.
 
बराख तयार करण्यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट, बांबू, प्लास्टिक ताडपत्री यांचा वापर करण्यात आलेला आहे. साधारणपणे गरजेनुसार लांबी व रुंदी चार फूट याप्रमाणे एका आरणीत साधारणपणे ५०० ते ६०० पिशवी कांदा बसू शकतो. या आरणीत कांदा साठण्याचे प्रमाण फार कमी असते.
 
कांद्याचा कलर व पत्ती चांगली राहते. अलीकडे महाराष्ट्र शासन मार्फत राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाकडून सध्या कांदा चाळीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य म्हणून ५, १०, १५, २० व २५ टन क्षमतेच्या कांदा चाळ उभारणीसाठी येणार्‍या खर्चाच्या ५० टक्के व कमाल ३, ५०० रुपये प्रतिटन क्षमतेनुसार अर्थसहाय्य दिले जाते. हे अनुदान अतिशय तुटपुंजे आहे. शासनाने ते वाढवून द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

Related Articles