काँग्रेसची ’जय हिंद सभा’ २० ते ३० मे दरम्यान   

नवी दिल्ली : सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ काँग्रेसने २० ते ३० मे दरम्यान देशभरातील १५ ठिकाणी ’जय हिंद सभा’ आयोजित केली आहे. या सभेमध्ये पहलगाम हल्ल्याशी संबंधित ’सुरक्षेत त्रुटी’ आणि भारताच्या सुरक्षा बाबींमध्ये ’अमेरिकेचा सहभाग’ यावर केंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला जाणार आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. 
 
वेणुगोपाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ऑपरेशन सिंदूर’चे राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन या विरोधात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी जय हिंद सभा आयोजित करण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. आपल्या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च शौर्य आणि यशाला अभिवादन करण्यासाठी ही सभा आहे. सुरक्षेतील त्रुटी, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सरकारची पद्धत आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींमध्ये अमेरिकेच्या सहभागावर सरकारचे मौन यावर सभेत गंभीर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
 
२० ते ३० मे दरम्यान दिल्ली, बारमेर, शिमला, हल्द्वानी, पाटणा, जबलपूर, पुणे, गोवा, बेंगळुरू, कोची, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, भुवनेश्वर आणि पठाणकोट येथे जय हिंद सभा आयोजित केल्या जातील, ज्यात माजी सैनिक, पक्ष नेते आणि सामान्य जनता उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर हा कोणत्याही एका पक्षाचा ब्रँड नाही. ऑपरेशन सिंदूरवर कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही; परंतु ज्या पद्धतीने त्याचे उघडपणे राजकारण केले जात आहे, ते फारच चुकीचे आहे.
 

Related Articles