बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा   

पुणे : बाजार समित्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरीय शिखर संस्था असावी, या उद्देशाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रविणकुमार नाहाटा यांच्यावर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संघाच्या इतिहासात सभापतीवर अशा प्रकारचा गुन्हा प्रथमच दाखल झाल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, तसेच सभापतीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी संचालकांनी केली आहे.
 
नाहाटा हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आहेत. गुन्हा दाखल होऊनही अजित पवार त्यांच्यावर कारवाई करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
 
राज्य शासनाच्या महाराष्ट्र अ‍ॅग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्ट (मॅग्नेट) योजनेतंर्गत एक कृषी उत्पादक कंपनी स्थापन केली जाईल आणि तुम्हाला त्याचे संचालक करण्यात येईल, असे सांगण्यात येऊन यामध्ये २० लाख रुपये गुंतवल्यास ७८ दिवसानंतर सरकारी योजनेनुसार ६० लाख रुपये परतावा मिळेल, यापैकी २५ लाख रुपये ते स्वत:साठी, ५ लाख रुपये अजय चौधरी या मध्यस्थीचे कमिशन आणि ३० लाख रुपये तुम्हाला परतावा म्हणून मिळतील, असे नाहाटा यांनी सांगितले. परतावा मिळाल्यानंतर तुमचा राजीनामा घेतला जाईल, असेही आश्वासन देण्यात आले. सुरुवातीला सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या राहुल मक्तेदार यांनी (वय ४३, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) गुंतवणूक करण्यास नकार दिला होता; मात्र नाहाटा यांनी आपण बाजार समिती संघाचे अध्यक्ष आहोत, ही सरकारी योजना आहे, असे सांगितल्याने विश्वासाने मक्तेदार यांनी दागिने विकून या योजनेत पैसे गुंतवले. याशिवाय अजय चौधरी यांनी दांडेघर गावातील जमीन विकसनासाठी १ कोटी ६० लाख रुपये हात उसने मागितले. एका महिन्यात पैसे परत देतो, असे सांगून चौधरी यांनी मक्तेदार यांच्याकडून रक्कम घेतली. अशा प्रकारे नाहाटा आणि चौधरी या दोघांनी मिळून दोन कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मक्तेदार यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
 
मक्तेदार यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीष निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला असता या दोघांनी ११ जणांना फसवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी यासंदर्भात प्रवीणकुमार नाहाटा (रा. ईशान्य सोसायटी, शंकर महाराज मठाजवळ, सातारा रोड), अजर चौधरी (रा गजनिया रोड, भांडारकर रोड), रविराज गजानन जोशी (रा. सिंहगड रोड) या तिघांवर गुन्हा दाखल केला असून अशा प्रकारे फसवणूक झाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन निरीक्षक निंबाळकर यांनी केले आहे.
 
दरम्यान, नाहाटा यांच्याकडे राज्यस्तरीय महत्त्वाचे पद आहे. त्यांच्या विरोधात गंभीर आर्थिक गुन्ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला असताना त्यांना जबाबदारीच्या पदावर ठेवणे पक्षाच्या नैतिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
अत्यंत दुर्दैवी बाब : रावल 
 
नाहाटा यांच्यावर मॅग्नेट प्रकल्पासंदर्भात दाखल झालेला गुन्हा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांच्यावर करावयाच्या कारवाईबाबत पुढील निर्णय महायुतीमधील सर्व नेत्यांबरोबर चर्चा करून घेतला जाईल, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी पुण्यात एका कार्यक्रमास आले असता पत्रकारांशी बोलताना दिली.

Related Articles