मालमोटारीची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोन मुले जखमी   

शिरूर, (वार्ताहर) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर फलके मळा (ता. शिरूर) चौकात कारेगाव येथे मालमोटारीने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात आईचा मृत्यू तर दोन मुले जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालमोटारीचा चालक फरार झाला आहे.या अपघातात आरती गणेश सावंत (वय ३३, रा. गंगा फेज ३ जुडिओ मॉलचे पाठीमागे बाबुराव नगर शिरूर जवळ) यांचा मृत्यू झाला आहे, तर स्वराज गणेश सावंत (वय १५) व स्वराली गणेश सावंत (वय १२) हे दोघे जखमी झाले आहे.
 
याबाबत सिद्धार्थ इंद्रभान गिरमकर (वय २८ वर्षे रा.उरळगाव ता शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कारेगाव, फलके मळा चौकामध्ये मालमोटार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एका दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यात दुचाकीवरील आरती सावंत यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी स्वराली गणेश सावंत व मुलगा स्वराज गणेश सावंत जखमी झाले आहेत. याप्रकरणी मालमोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चव्हाण करीत आहे.
 
दोन्ही जखमी मुलांना पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवण्यात आले आहे. अतिशय धोकादायक बनलेल्या फलके मळा चौकबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. याच ठिकाणी अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौकाची दुरुस्ती करून नागरिकांसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Related Articles