कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे   

पाकिस्तानला थप्पड; भारतीय शिष्टमंडळाचा राजनैतिक विजय

बोगोटा : भारतीय सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानातील प्राणहानीचा निषेध कोलंबियाने केला होता. त्या संदर्भातील निषेधाचे निवेदन यापूर्वी प्रसिद्ध केले होते. अखेर ते शनिवारी मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारताची भूमिका परखडपणे मांडली. त्यामुळे जागतिक मंचावर भारताचा राजनैतिक विजय झाला आहे.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान पुरस्कृत 
 
दहशतवादाचा बुरखा जागतिक मंचावर फाडण्यासाठी दहा देशांत भारताने खासदारांची सात शिष्टमंडळे पाठवली होती. त्यापैकी एक शिष्टमंडळ शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली कोलंबियातही गेले होते. कोलंबियाने मात्र, भारताच्या सैन्य कारवाईनंतर ८ मे रोजी पाकिस्तानची भलावण केली होती. तसेच तेथे ठार झालेल्या दहशतवाद्यांबाबत सहानुभूती दाखवली होती. तसेच निषेधाचा सूरही आळवला होता. त्याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले होते. मात्र, भारतीय शिष्टमंडळाने वस्तुस्थितीची माहिती दिली. भारत अनेक दशके पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने होरपळला आहे. सीमेपलीकडून दहशतवादी भारतीय हद्दीत हल्ले करत आले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला त्यापैकीच एक होता. पर्यटक महिलांच्या पतींची त्यांचा धर्म विचारुन दहशतवाद्यांनी हत्या केली होती. दहशतवाद मानवतेला धोका आहे. अशा घटना मानवतेला काळिमा फासणार्‍या होत्या. त्यामुळे दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणे भारताला भाग पडले होते. तसेच कारवाई केवळ आणि केवळ दहशतवाद्यांवर आणि त्यांना पोसणार्‍यांवर केली होती. या सर्व बाबी थरुर यांनी कोलंबिया सरकारला पटवून दिल्या होत्या. थरुर यांनी कोलंबियाचे उप परराष्ट्र मंत्री रोझा योलांडा व्हिलाविचेंसिओ यांंच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर कोलंबियाने वादग्रस्त निवेदन मागे घेतले. 
 
भारताची बाजू प्रखरपणे मांडली
 
गेल्या दोन दिवसांपासून भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ कोलंबियात होते. त्यांनी कोलंबियातील ज्येष्ठ राजकीय नेत्यांसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने शून्य दहशतवाद धोरण स्वीकारल्याचे आहे. त्या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ हल्ले करुन नष्ट केल्याचेही सांगितले. या वेळी शिष्टमंडळाने कोलंबियाच्या संसदीय परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष अलेजांद्रो टोरो आणि लोकसभेचे सभापती जेमी राऊल सलामांका यांची भेट घेतली होती. दोघांनीही भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. संरक्षणाबरोबरच, भूमी आणि सौर्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा भारताला अधिकार असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले होते, असे शशी थरुर यांनी सांगितले. याच दरम्यान, शिष्टमंडळाने कोलंबियाच्या आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेशी चर्चा केली होती.  
 
ब्राझिल आणि अमेरिकेत जाणार 
 
थरुर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाजपचे तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कालिटा, शिवसेनेचे मिलिंद देवरा, लोकजन शक्ती पक्षाचे शांभवी, तेलगू देशम पक्षाचे जीएम हरिष बालयोगी आणि अमेरिकेतील माजी राजदूत तरनजित सिंग सिंधू यांचा समावेश होता.  आता कोलंबियाचा दौरा आटोपून शिष्टमंडळ ब्राझिलला जाणार आहे यानंतर ते अमेरिकेत पोहोचणार आहे. 
 
थरुर यांची भूमिका ठरली महत्त्वाची 
 
शशी थरुर यांनी कोलंबियाचे निवेदन अत्यंत निराशजनक असल्याचे सांगितले होते. यानंतर कोलंबियाने भारताची बाजू उचलून धरत  निवेदन मागे घेत असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी शिष्टमंडळाने गयाना आणि पनामा या देशांचा दौरा केला होता. त्यानंतर ते कोलंबियाला पोहोचले होते. 

Related Articles