शहर स्वच्छतेसाठी महापालिका राबविणार विशेष अभियान   

पुणे : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेकडून आता विशेष अभियान राबविले जाणार आहे. स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांचा सहभाग, जनजागृती बरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी त्यांनी स्वच्छतेच्या संदर्भात पुण्यात काम करणार्‍या विविध ६० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. 
 
या संस्थांकडून स्वच्छतेच्या संदर्भात सुरु असलेल्या कामाची माहीती त्यांनी घेतली. यावेळी अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. ओमप्रकाश दिवटे आदी वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.यासंदर्भात आयुक्त नवल किशोर राम म्हणाले,‘देश आणि राज्य पातळीवर ज्या पद्धतीने स्वच्छतेसंदर्भात अभियान राबविले जाते. त्याच पद्धतीने आता पुणे शहरात अभियान राबविले जाईल. यादृष्टीने पुण्यातील स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. या संस्थांकडून केल्या जाणार्‍या कामांची माहिती घेऊन त्यांच्या कामाचा महापालिकेच्या कामात कसा समावेश केला जाऊ शकतो का? याचा विचार पुढील काळात केला जाईल. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरीकांचा सहभाग वाढविणे महत्वाचा आहे. त्यादृष्टीने पुढील काळात प्रयत्न केले जाणार आहे.’
 
महापालिकेच्या यंत्रणेकडूनही स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी मान्य केले. स्वच्छतेच्या कामात प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटी दूर करण्यावर भर राहील, असे त्यांनी नमूद केले. सफाईचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या हजेरी संदर्भात लक्ष दिले जाईल. या कर्मचार्‍यांची हजेरी नोंदविण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या ‘वॉच’ योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

Related Articles