हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा   

पाच जणांचा विमान अपघातात शेवट, 'ते' स्वप्न अधुरंच

अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या दुर्घटनेत बांसवाडा येथील व्यास कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. विमानात बसून काढलेला सेल्फी हा त्यांच्या जीवनातील शेवटचा क्षण ठरला. एअर इंडियाची फ्लाईट एआय-171 टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच मेघानी नगरच्या भागात कोसळली. या दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी केवळ एक जण बचावला, परंतु व्यास कुटुंबाचा त्यात दुर्दैवी अंत झाला.

स्वप्न अधुरेच राहील

डॉ. कोमी व्यास, त्यांचे पती प्रतीक जोशी आणि त्यांची तीन मुले एका नव्या आयुष्याची स्वप्ने घेऊन लंडनला निघाले होते. व्यास कुटुंबाचा शेवटचा सेल्फी शेअर केला आहे. डॉ. कोमी व्यास बांसवाडा येथील प्रसिद्ध डॉक्टर होत्या. उदयपूरच्या पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत होत्या. कुटुंबा बरोबर राहता यावे यासाठी त्यांनी दोन दिवसांपूर्वीच नोकरी सोडली होती. प्रतीक जोशी हे मागील सहा वर्षांपासून लंडनमध्ये 'सॉफ्टवेअर प्रोफेशनल' म्हणून कार्यरत होते. कोमी आणि त्यांच्या मुलांना आता कायमस्वरूपी त्यांच्यासोबत लंडनमध्ये स्थायिक होण्याची संधी मिळाली होती. अहमदाबाद विमानतळावर उड्डाण घेण्यापूर्वी कोमी आणि प्रतीक यांनी मुलांसोबत हसतमुख सेल्फी काढला होता.

बासंवाडा शहरावर दुःखाचा डोंगर

ही हृदयद्रावक घटना घडली आणि त्यांचे सारे स्वप्न क्षणात भंगले. अहमदाबाद विमान दुर्घटनेची बातमी बांसवाडात पोहोचताच व्यास कुटुंबाच्या घरी शोककळा पसरली आहे. नातलग, मित्र आणि शेजारी दुःखाने व्याकूळ झाले. बांसवाडा शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका प्रतिष्ठित डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाचा अशा प्रकारे अंत होणे, हे अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून निघणार नाही. ही घटना केवळ व्यास कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी एक मोठा आघात आहे.
 

Related Articles