पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांत आता ५० टक्के कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश   

यूजीसीची महत्त्वपूर्ण योजना

पुणे : पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये आता ५० टक्के शिक्षण हे कौशल्यावर आधारित असणार असून विद्यापीठ अनुदान मंडळाने (यूजीसी) याबाबत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने हे परिवर्तन करण्यात येत आहे. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती युजीसीचे माजी अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी दिली.
 
या नव्या योजनेअंतर्गत बीए, बीकॉम, बीएससी अशा पदवी अभ्यासक्रमांतील एकूण १६० श्रेयांकांपैकी अर्धे म्हणजे ८० श्रेयांक मुख्य विषयासाठी, तर उर्वरित ८० श्रेयांक हे विविध कौशल्यवर्धक अभ्यासक्रमांद्वारे पूर्ण करावे लागणार आहेत. यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांकडे केवळ विषयज्ञानच नव्हे, तर उद्योगजगतात उपयुक्त ठरणारी व्यावहारिक कौशल्येही असतील.
 
सध्या देशभरात सुमारे साडेचार कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यातील ७० टक्के विद्यार्थी पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांत प्रवेश घेतात. मात्र, बदलत्या तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेता हे अभ्यासक्रम पुरेसे रोजगारनिर्मितीक्षम नाहीत, असे निरीक्षण युजीसीने नोंदवले आहे. त्यामुळे ’इंटिग्रेटेड स्कील्ड कोर्सेस’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
इतिहास विषयात बीए पदवी घेणार्‍या विद्यार्थ्याने पहिल्या दोन वर्षांत इतिहास विषयासाठी ८० श्रेयांक मिळवणे आवश्यक आहे. उर्वरित दोन वर्षांत त्याला संगणक, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट रायटिंग, डाटा अ‍ॅनालिसिस, परदेशी भाषा अशा उद्योगोपयोगी कौशल्यांचे प्रशिक्षण मिळेल. ही योजना केवळ विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेसाठीही मैलाचा दगड ठरणार आहे, असे एम. जगदीश कुमार यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles