संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान   

आळंदी, (वार्ताहर) : श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात अग्रभागी असणार्‍या देवाच्या व स्वाराच्या अश्वांचे प्रस्थान अंकली, जि. बेळगांव येथून रविवारी हरिनाम गजरात झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात मानाचे स्थान असलेल्या माऊलींच्या अश्वाचे शितोळे-अंकली (ता. चिकोडी, जि. बेळगांव) येथून प्रस्थान झाले. हे अश्व अंकली ते आळंदी हा पायी प्रवास करुन १८ जून रोजी आळंदीत येत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीत दाखल होतील. १९ जून रोजी आळंदी मंदिरातून श्रीं’चे वैभवी पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातून प्रस्थान होणार आहे.  
 
सन १८३२ मध्ये श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरु झाला. अगदी तेव्हापासून श्रीमंत शितोळे सरकार यांचे अश्व व देवाला रात्री मुक्कामाचे ठिकाणी तंबू देण्याची परंपरा आहे. १९ जून रोजी आषाढी पायी वारी पालखी सोहळा आळंदीतून पंढरीकडे प्रस्थान करेल. अंकली येथील शितोळे सरकारांच्या राजवाड्यात अश्वांचे विधिवत पूजन, परंपरांचे पालन करीत धार्मिक पूजा विधी झाल्यानंतर श्रीमंत शितोळे सरकार यांचे नियंत्रणात पूजना नंतर नगर प्रदक्षिणा झाल्यावर या अश्वाचे आळंदीकडे प्रस्थान झाले हरिनाम गजरात झाले.
 
या प्रसंगी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, माऊलीशेठ गुळुजंकर, राहुल भोर, सत्यवान बवले, अजित मधवे, निखिल कदम, माऊलींचे मानकरी योगीराज कुर्‍हाडे पाटील, योगेश आरु, बाळासाहेब गायकवाड, पालखी वाहक शंकर मारुती, कुर्‍हाडे आदी उपस्थित होते. उत्साही हरिनाम गजरात, चैतन्यमय वातावरणात अश्व प्रस्थान आळंदीकडे झाले. प्रस्थान सोहळा आनंदमयी वातावरणात सोहळा पार पाडला.

अश्वांची परंपरा

माऊलींच्या पालखी सोहळ्यात ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालत असतो तो माऊलींचा अश्व. दुसरा अश्व ज्यावर जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व असे हे दोन अश्व असतात. या अश्वांची मानाची परंपरा कर्नाटकातील अंकली येथील शितोळेराजे यांच्याकडे आहे. सध्या ही परंपरा ऊर्जितसिंहराजे शितोळे सरकार हे चालवत आहेत. हे दोन्ही अश्व सोहळ्यात सामील होण्यासाठी पायी अंकली येथून आळंदी येथे दाखल होतात.

अश्वांचा प्रवास मार्ग

मिरज, सांगलवाडी, इस्लामपूर पेठनाका, वहागाव, भरतगाव, सारोळा, शिंदेवाडी, पुणे मार्गे आळंदीत १८ जूनला हरिनाम गजरात अश्व आळंदीत प्रवेशनार आहे. पायी हरिनाम गजरात प्रवास असल्याचे श्रीमंत सरदार कुमार महादजी राजे शितोळे सरकार अंकलीकर यांनी सांगितले. सोहळ्यात श्रीमंत सरदार उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांचे मार्गदर्शन परंपरेने होत आहे.

शितोळे घराण्याचा राजाश्रय

१८३२ मध्ये हैबतबाबा आरफळकर यांनी माऊलीचा पालखी सोहळा सुरू केला तेव्हा शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार शितोळे सरकारांच्या तंबूत माऊलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाज आरतीसाठी उपस्थिती, वारीतील न्याय निवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे असे रितीरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे ४ वाजता अश्वास निमंत्रण द्यायला चोपदार जातात व त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तिथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो.  
 
श्री माऊलींच्या अश्वांचे परंपरेने शितोळे सरकार यांचे वैभवी वाड्यातील श्री आंबे मातेची पूजा करून सरदार शितोळे वाडा अंकली, बेळगाव येथून अश्वांचे आळंदीकडे हरिनाम गजरात प्रस्थान झाले.
 

Related Articles