उन्हाळ्यातही एसी, कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत घट   

वृत्तवेध 

उन्हाळ्यामध्ये चांगल्या हंगामाची अपेक्षा असलेल्या थंड उत्पादनांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांना या वेळी मोठा धक्का बसला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान अपेक्षेप्रमाणे न वाढल्यामुळे एसी, कोल्ड्रिंक्स आणि टॅल्कम पावडरसारख्या वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाली. परिणामी, या कंपन्यांना आपले उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत कमी करावे लागले आहे. भारतीय हवामान विभागाने या वर्षी तीव्र उष्णतेचा अंदाज वर्तवला होता. त्या आधारे कंपन्यांनी मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणात साठा जमा केला. त्यांना आशा होती की २०२४ प्रमाणे या वेळीही विक्रीचे रेकॉर्ड मोडतील; पण अपेक्षा भंगल्या. परिणामी, कंपन्यांवर आता न विकलेल्या स्टॉकचा भार पडला आहे, ज्याची विल्हेवाट लावणे कठीण होत आहे. गोदरेज एंटरप्रायझेसचे अप्लायन्स बिझनेस हेड कमल नंदी यांच्या मते गेल्या वर्षीच्या तुलनेत दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतात एसीच्या विक्रीमध्ये २५-३० टक्के घट झाली.
 
त्यामुळे उत्पादन २० टक्क्यांनी कमी करावे लागले. ‘ब्लू स्टार’चे एमडी. बी. त्यागराजन म्हणाले की एप्रिलमध्ये एसीच्या विक्रीमध्ये १५-२० टक्क्यांची घट झाली. प्रत्यक्षात या कंपनीला २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित होती. उत्पादन कमी करून साठा संतुलित करता येतो असे त्यांचे मत आहे. एका मोठ्या शीतपेय कंपनीच्या अधिकार्‍याने सांगितले की मागणी कमी असल्याने दक्षिण आणि पूर्वेकडील भागात शिफ्टची संख्या कमी करण्यात आली. पूर्वी उत्पादन दोन शिफ्टमध्ये होत असे; आता फक्त एकाच शिफ्टमध्ये काम केले जात आहे. ‘इमामी’सारख्या कंपन्यांनी सांगितले की, पाऊस आणि कमी तापमानामुळे दक्षिण आणि पूर्व भारतात टॅल्कम पावडरच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. विशेषतः, त्यांनी उष्णतेच्या तीव्रतेच्या अंदाजावर आधारित मोठ्या प्रमाणात जाहिरात आणि उत्पादन केले होते. तो आता तोट्यात जाणारा उपक्रम ठरला आहे.

Related Articles