भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर   

काठमांडू : भारतीय आणि नेपाळी सैन्याच्या सदस्यांनी कांचनजंगा पर्वतावर संयुक्त चढाई केल्याने द्विपक्षीय संबंधांना चालना मिळेल, असे नेपाळचे संरक्षण मंत्री मनबीर राय यांनी म्हटले आहे. येथील लष्कर मुख्यालयात आयोजित ’नेपाळ-भारत संयुक्त माउंट कांचनजंगा पर्वतारोहण मोहिमेच्या’ ध्वजारोहण समारंभात राय यांनी हे विधान केले. नेपाळ लष्कराच्या १० आणि भारतीय लष्कराच्या ५ सैनिकांच्या संयुक्त पथकाने १९ आणि २० मे रोजी जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर केले. कांचनजंगा पर्वताची उंची ८,५८६ मीटर आहे. या संघातील सदस्यांनी या मोहिमेचा ध्वज नुकताच संरक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द केला. संरक्षणमंत्र्यांनी उच्च पातळीचे समन्वय आणि धैर्य दाखवल्याबद्दल सदस्यांचे कौतुक केले.मनबीर राय म्हणाले, ही मोहीम द्विपक्षीय संबंधांना आणखी बळकटी देण्यास आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांना नवीन उंचीवर नेण्यास मदत करेल. दरम्यान, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल अजय रामदेव आणि नेपाळमधील भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव हे देखील या समारंभाला उपस्थित होते.

Related Articles