आळंदीजवळील कत्तलखान्याचे आरक्षण वगळणार : उदय सामंत   

महापालिकेच्या हद्दीतील इंद्रायणी नदी लगतचे आरक्षण

आळंदी, (वार्ताहर) : आळंदी जवळील महापालिकेच्या हद्दी कत्तलखान्याचे आरक्षण पिंपरी चिंचवड महापालिकेने ठेवले असून ते आरक्षण आराखड्यातून वगळणार असल्याची ग्वाही राज्याचे मराठी भाषा, तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आळंदीतील धार्मिक कार्यक्रमात दिली.प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त आळंदीत कृतज्ञता सोहळा व गौरवग्रंथ प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते.
 
या कार्यक्रमात चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते प्रमोद महाराज जगताप यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आनंदामोद या गौरव ग्रंथाचे प्रकाशन देखील करण्यात आले. यावेळी शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, बंडातात्या महाराज कराडकर, खासदार राजाभाऊ वाजे, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, अक्षय महाराज भोसले, अजित वडगावकर, विलास वाघमारे, विश्वम्भर पाटील यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, प्रमोद महाराज यांच्या सत्कार सोहळ्यास हजर राहण्यास मिळाले. हे माझे परम भाग्य आहे. वारकरी संप्रदयातील मान्यवरांच्या बरोबर बसण्याचे भाग्य लाभले.
 
अनेक राजकीय कार्यक्रमात सत्कार स्विकारतो. मात्र वारकर्‍यांचा फेटा हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा सत्कार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भाग्यवान आहे. वारकरी संप्रदायातील थोर गुणवंतांचा वारसा त्यांना मिळाला आहे. हिंदी, मराठी गाण्याच्या आवडी बाबत ते म्हणाले, माझ्या आयुष्यात लहानपणापासून विठुरायाची गाणी ऐकत मोठा झालो आहे. प्रल्हाद शिंदे यांची विठुरायाची सर्व गाणी म्हणू शकतो. माऊलींकडे सर्व सामान्य माणूस जिवाभावाने येतो. या परिसरात कत्तलखाना सुरू होणार असल्याबाबत ते म्हणाले, सर्व महंतांच्या साक्षीने सांगतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये जे कत्तलखान्याचे आरक्षण दर्शविण्यात आले आहे. ते वगळणार आहे. यासाठी त्यांनी ग्वाही दिली.

Related Articles