महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा   

१३ पैकी १२ तलावांचे खासगीकरण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून शहरातील १३ पैकी १२ जलतरण तलावाचे खासगीकरण केले आहे. हे जलतरण तलाव तीन वर्षापासून ठेकेदाराच्या ताब्यात दिले आहेत. कारण, जलतरण तलावावर नियमित खर्च करणे परवडत नाही. याकरिता उपलब्ध मनुष्यबळ,  इतर सुविधा पुरविताना महापालिकेची दमछाक होत आहे. महापालिकेच्या जलतरण तलावास चांगला प्रतिसाद मिळत असून जलतरण तलावाचे उत्पन्न लाखात तर देखभालीचा खर्च कोटीत जावू लागला आहे. त्यामुळे जलतरण तलाव पालिकेसाठी ‘पांढरा हत्ती’ ठरु लागली आहेत. यामुळे जलतरण तलाव खासगीकरणाचा निर्णय महापालिकेकडून घेतला आहे.  
 
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील १२ सार्वजनिक जलतरण तलाव ठेकेदारांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तीन वर्षे हे तलाव संबंधित ठेकेदार चालविणार आहे. तिकीट विक्री, स्वच्छता, सुरक्षा, पाणी शुद्धीकरण आदी सर्व कामकाज ते पाहणार आहे. परिणामी, महापालिकेच्या कोट्यवधी रूपये खर्चाची बचत होणार आहे,  असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे. 
 
चिंचवडच्या केशवनगरमधील वस्ताद बाळासाहेब गावडे जलतरण तलावासह निगडी, प्राधिकरणातील तलावाचेही खासगीकरण करण्यात येत आहे. हा तलाव तीन वर्षांसाठी एका खासगी एजन्सीला देण्यात आला असून, ती एजन्सी महापालिकेस एकूण २५ लाख ५६ हजार रूपये देणार आहे.
 
महानगरपालिकेच्या क्रिडा विभागाचे एकूण १३ सार्वजनिक तलाव आहेत. त्या तलावावर पोहण्यासाठी मुलांसह नागरिकांची दररोज मोठी गर्दी होते. उन्हाळ्यात तुंडूब गर्दी होते. तलाव संचालन,  देखभाल व दुरूस्तीचा खर्च महापालिकेस परवडत नाही म्हणून महापालिकेने सर्व तलाव खाजगी एजन्सींना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक-एक करीत सर्व तलावांचे खासगीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात संभाजीनगर, वडमुखवाडी, यमुना नगर, पिंपळे गुरव, भोसरी, पिंपरी गाव, सांगवी, कासारवाडी, नेहरूनगर आणि थेरगाव असे एकूण दहा तलावांचे खासगीकरण करण्यात आले. गेल्या महिन्यात निगडी, प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे खासगीकरण करण्यात आले.
 
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, महानगरपालिकेचे शहरातील १३ जलतरण तलावांपैकी १२ तलाव तीन वर्षे चालविण्यासाठी खासगी एजन्सींना देण्यात आले आहेत. सध्यस्थितीत मोहननगर, चिंचवड येथील राजर्षी शाहू महाराज तलावाची दुरूस्तीचे काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर तो तलावही खासगी एजन्सीला देण्यात येईल.
 
दरम्यान, यामुळे महापालिकेचा जलतरण तलावावर होणारा कोट्यवधींच्या खर्चात बचत होणार आहे. पाणी शुद्धीकरण, सुरक्षारक्षक, जीवरक्षक, कर्मचारी, क्रीडा पर्यवेक्षक तसेच,  दुरूस्ती काम, सुशोभीकरण, वीज बिल, पाणीपट्टी व इतर खर्च वाचणार आहे. ठेकेदारांकडून महापालिकेस एका तलावासाठी तीन वर्षांकरीता एकूण २८ लाख ६५ हजार ६०० रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

Related Articles