निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)   

बांगला देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना  यांच्या विरुद्ध  तेथे खटला सुरु झाला आहे. त्या सध्या भारतात आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत-इन अ‍ॅब्सेन्शिया- हा खटला चालवला जात आहे. ‘सामूहिक हत्याकांड’ हा हसीना यांच्या विरुद्धचा मुख्य आरोप आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी लवादासमोर हा खटला चालवला जात आहे. बांगला देशातील सध्याच्या हंगामी सरकारने हा खटला भरला आहे.  हसीना यांना आपल्या ताब्यात  देण्याची मागणी या सरकारने गेल्या वर्षी केली होती. सरकारी वकील ताजुल इस्लाम यांनी आंतरराष्ट्रीय लवादासमोर आरोपांची यादी सादर केली. शेख हसीना यांच्या खेरीज  त्यांच्या सरकारमधील गृहमंत्री असदुझ्झमान खान कमाल व माजी पोलिस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल मामुन हे अन्य दोन आरोपी आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये बांगला देशात हसीना सरकारच्या विरोधात नागरी असंतोष निर्माण झाला. तो दडपण्यासाठी या तिघांनी अमानवी कृत्ये  केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या तिन्ही आरोपींना येत्या दि.१६ रोजी न्यायालयात हजर करण्याचा आदेश लवादाने दिला आहे. हा खटला सुरु झाला त्याच दिवशी बांगला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘जमात  ए इस्लामी’ या पक्षाची नोंदणी वैध ठरवली. आता हा पक्ष तेथील आगामी निवडणुकीत सहभागी होऊ शकेल.बांगला दशाचे जनक शेख मुजीबूर रेहमान व त्यांच्या कन्या  हसीना यांना नामशेष करणे व लोकशाही संपवणे या उद्देशाने हसीना यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा निकाल काय लागेल हे जग ओळखून आहे. 
 
सूड हा उद्देश
 
वरील दोन बाबी ‘न्यायाच्या तत्त्वा’ला धरून झाल्या आहेत असे मानणे धाडसाचे आणि भाबडेपणाचे ठरेल. माजी पोलिस महासंचालक मामुन गेले अनेक दिवस पोलिस कोठडीत आहेत. हसीना व कमाल बांगला देशाबाहेर आहेत. ते दोघेही लवादासमोर आपले म्हणणे मांडू शकणार नाहीत, तरी खटल्याचे कामकाज चालणार आहे. सरकारी नोकर्‍यांमधील राखीव जागा, या मुद्द्यावरून बांगला देशात गेल्या वर्षी युवा वर्गाने आंदोलन सुरु केले. त्यात वरवर पाहता काही गैर दिसत नाही; पण अल्पावधीत त्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. शेख हसीना यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली. त्यामुळे त्या निदर्शनांमागे अन्य कोणाचा मेंदू आहे असा संशय येणे स्वाभाविक आहे. गेल्या १४ जुलै रोजी हसीना यांची पत्रकार परिषद झाली. त्या नंतर निदर्शकांना पांगवण्यासाठी सरकारने कारवाई केली. हसीना, त्यांचे गृहमंत्री व पोलिस महासंचालक यांनी ‘पद्धतशीरपणे’ नागरिकांचे हत्याकांड घडवून आणले असा मुख्य आरोप आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान झालेल्या हिंसाचारात सुमारे १४०० जण मारले गेले होते. हसीना यांचे सरकार पडल्यानंतरही हिंसक घटना सुरु होत्या. ‘विद्यार्थी’ एवढा हिंसाचार करू शकतात का? या मुद्द्याकडे फिर्यादी पक्षाने दुर्लक्ष केलेले दिसते. पोलिस व सुरक्षा दले तसेच अवामी लीग या पक्षाच्या सशस्त्र शाखेने नागरिकांविरुद्ध ‘गुन्हे’ केले. त्यास हसीना व इतर दोघांची साथ होती, त्यांनी हा हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न केला नाही असे अन्य आरोप या तिघांवर आहेत. अवामी लीग या हसीना यांच्या पक्षावर महमद युनस यांच्या हंगामी सरकारने नुकतीच बंदी घातली. हसीना यांनी जमात ए इस्लामी या पक्षावर बंदी घातली होती, ती उठवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी लवादाची स्थापना हसीना यांनीच २००९मध्ये केली होती. बांगला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या काळात पाकिस्तानी लष्कराने १९७१ मध्ये बांगला देशात तेथील जनतेवर जे अत्याचार केल. त्याच्या चौकशीसाठी हा लवाद आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्थापन केला गेला होता. बांगला देशीयांना न्याय मिळवून देणे हा त्यामागचा उद्देश होता. हसीना यांचे भारत प्रेम पाकिस्तानला रुचणे शक्यच नव्हते; पण अन्य कोणा देशालाही ही जवळीक नको होती का असा संशय येत आहे. भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान ही डोकेदुखी आहे, पूर्वेला चीनचा त्रास आहे. आता आग्नेयेकडे बांगला देश नामक पीडा निर्माण झाली आहे. इंटरनॅशनल क्राइम ट्रायब्युनल किंवा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी लवादाच्या कायद्यांनुसार, जर गुन्हा सिद्ध झाला तर मृत्यु दंड ही शिक्षा आहे. हसीना व इतरांना नाहीसे करणे हे ठरवून त्यांच्या विरुद्ध खटला सुरु आहे हे स्पष्ट आहे. 

Related Articles