कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस (कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद)
 
रामप्रसाद बिस्मिल हे क्रांतीकारी विचारांचे, प्रतिभावान लेखनाचे आणि निर्भय कृतीचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी विचारांची, कलमाची आणि बंदुकीची एकत्र गाथा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लिहिली. त्यांची फाशी क्रांतीचा पुनर्जन्म ठरली. त्यांच्या कविता आणि लेख आजही क्रांतीकारी चेतनेचे प्रतीक आहेत. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे आणि तरुणांमध्ये क्रांतीची प्रेरणा निर्माण करणारे योद्धे म्हणून त्यांना ओळखले जाते.
 
कवी, लेखक आणि क्रांतीकारी कार्यकर्ता या तीन भूमिका निभावणारे पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी लिहिलेली सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है... ही काव्यपंक्ती आजही ऐकताना अंगावर रोमांच उभे करतात. ही ओळ त्यांनी फाशीपूर्वी गोरखपूरच्या तुरुंगात लिहिली. फाशीनंतर बाणासारखी ही कविता देशभर पसरली. काकोरी कटाचे प्रमुख सूत्रधार पं. रामप्रसाद बिस्मिल यांची अशी उत्कट इच्छा होती की, तुरूंगातून साहसाने बाहेर पडून प्रत्यक्ष हातघाईच्या युद्धांत प्राण ठेवावा. मृत्यूच्या छायेत त्यांनी लिहिलेली कविता पुढीलप्रमाणे आहे....
 
पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी शिवाजी समितीचे सशस्त्र संघटन ब्रिटीशांविरुद्ध स्थापन केलेल्या पं. गेंदालाल दीक्षित यांच्या प्रेरणेने क्रांतीकारक मार्गात आपल्या विद्यार्थीदशेतच पदार्पण केले. दीक्षित यांच्याबरोबर मैनापुरी षडयंत्राच्या प्रकरणात बिस्मिल यांनी भाग घेतला होता. बिस्मिल यांच्या नावाने वॉरंट निघताच ते गुप्त झाले. या अज्ञातवासात नेपाळ, आग्रा, राजपुताना इत्यादी भागात त्यांनी अत्यंत कष्टमय जीवन व्यतीत केले. पुढे सम्राटाच्या घोषणेने आपल्यावरील वॉरंट काढून घेण्यात आले हे पाहून ते आपल्या शाहजहापूर गावी घरी परतले व रेशमाचा तागा बनविण्याचा कारखाना काढून व्यावसायिक जीवन व्यतीत करू लागले. फेब्रुवारी १९२० मध्ये मैनापुरी कट रचण्याच्या खटल्यातील सर्व कायद्यांना मुक्त करण्यात आले होते; पण स्वभावसिद्ध पं. रामप्रसाद बिस्मिल या स्वातंत्र्यवाद्याला हे स्वास्थ्याचे जीवन न रुचून त्यांनी क्रांतीकारक आंदोलनाचे कार्य १९२३ मध्ये शचींद्रनाथ सन्याल यांच्याबरोबर भारतातील संपूर्ण संयुक्त प्रांतात सुरु केले. काकोरे प्रकरणाचे सूत्रधार म्हणून १९ डिसेंबर १९२७ रोजी पं. रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर तुरुंगात फाशी देण्यात आले.
 
मिट गया जब मिटनेवाला फिर सलाम आया तो क्या ?
दिल की बरबादी के बाद उनका पयाम आया तो क्या ?
 
बिस्मिल यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या त्यांच्या सहकार्‍यांना यश न आल्याने संघटनेसाठी त्यांच्याकडे असणारी माहिती मिळविण्यासाठी त्यांची भेट घेणे क्रांतीकारकांना आवश्यकच होते. क्रांतीच्या कार्यात व्यक्तीच्या प्राणांना मोल नसून ते कार्यालाच असते. या हौतात्म्याने कार्य बंद पडू नये म्हणून त्यांच्या जवळून शस्त्रसंग्रहाचे व इतर साहित्याचे पत्ते घेणे ही महत्वाची बाब होती. फाशी जाणार्‍या कैद्याला फाशीच्या आदल्या दिवशी त्यांच्या निकटवर्ती आप्पांना भेटविण्याची व्यवस्था करतात. त्या संधीचा फायदा घेण्यासाठी शिववर्मा हे क्रांतीकारक गोरखपूरला गेले. तिथे पं. रामप्रसाद बिस्मिल यांच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर जेलमध्ये नेण्याची विनंती केली; पण त्यांनी ती नाकारल्यावर शिववर्मा हे तुरूंगाच्या दाराशी त्या दिवशी पहाटेच येऊन थांबले होते. वडिलांनी आपल्या पत्नीलाही बरोबर घेऊन जाण्याचे नाकारल्याने मातृहृदयी आई आपल्या प्रतापी मुलाच्या अंतिम भेटीसाठी तुरुंगाच्या दाराशी उभी होती. शिववर्मा हळूच माताजींना म्हणाले... मी बिस्मिल यांच्या समितीचा मनुष्य असून समितीच्या वतीने त्यांची शेवटची भेट घेऊ इच्छितो. आपण मला बरोबर न्याल काय? त्या माऊलीने शिववर्मा यांना आपला पुतण्या आहे असे सांगून बरोबर नेले. या मातापुत्रांच्या भेटीचे शिववर्माने स्वतःच वेगळ्या नावाने रोमांचकारी वर्णन केले आहे. ते लिहितात, बिस्मिल यांची त्यांच्या आईशी जेव्हा हृष्टादृष्ट झाली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रुसरी ओघळूं लागल्या. ती माता त्यांना म्हणाली, ’तू मृत्यूला इतका घाबरला असशील असे मला वाटले नव्हते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी परकीय सरकारशी युद्ध करणार्‍या मुलाला जन्म दिला याचा मला केवढा गर्व वाटत होता. त्या अभिमानाने मी मस्तक उंच करून येथे आले. ज्यांच्या साम्राज्यावर कधी सूर्य मावळत नाही, त्या राज्यकर्त्यांना सुद्धा माझा मुलगा भीत नाही, याचा मला मोठा अभिमान वाटत होता; पण तुला अश्रू ढाळतांना पाहून मला अतिशय दु:ख होते. जर फाशीला तू इतका घाबरत होतास, तर या मार्गाने का गेलास? बिस्मिल यांनी आपले अश्रू आवरून आईला विश्वास दिला, की त्याचे अश्रू मृत्यूच्या भयाचे नसून आईविषयीच्या केवळ शुद्ध प्रेमाचे आहेत. नंतर बिस्मिल यांची त्यांच्या पित्याशी जेव्हा भेट झाली, तेव्हा वडील अत्यंत शोकाकुल झाले. तेव्हा बिस्मिल त्यांना म्हणाले... आपण तर पुरुष आहात. एकदा माताजींकडे तर पाहा. माझी तर अशी कल्पना होती की, आपण त्यांचे सांत्वन कराल. शिववर्मा यांच्याशी झालेल्या अंतिम भेटीत बिस्मिल यांनी त्यांना समितीच्या शस्त्रसंग्रहाचे दोन पत्ते सांगितले होते. त्यातील एक वकीलाचा होता. हे वकील प्रथमतः टाळू लागले; पण नंतर समितीची फसवणूक केल्यास कोणती शिक्षा होती याची शिववर्मा यांनी कल्पना दिल्यावर वकील महाशयांनी त्यांच्या स्वाधीन चार रिव्हॉल्वर्स व भरपूर काडतुसे असलेली एक बॅग दिली.
 
ब्रिटिश विरोधात संघर्ष
 
रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म ११ जून १८९७ रोजी पूर्वीच्या वायव्य प्रांतातील शाहजहापूर जिल्ह्यातील मुरलीधर आणि मूलमती देवी यांच्या पोटी झाला. बिस्मिलचे पूर्वज बुंदेलखंड प्रांतातील होते. हा प्रांत रुढीवादी समाज आणि बंडखोर वृत्तीच्या दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध होता. त्यांनी घरीच त्यांच्या वडिलांकडून हिंदी शिकले, तसेच एका मौलवीकडून उर्दूचे ज्ञान घेतले. इंग्रजी भाषेच्या शाळेमध्येही त्यांनी शिक्षण घेतले. आजूबाजूच्या सामाजिक पुराणमतवादामुळे अस्वस्थ झालेल्या बिस्मिल यांना आर्य समाजात रस निर्माण होऊन ते त्यात सहभागी झाले. त्यांना अनेक विषयांवरील ज्ञानामुळे पंडित ही पदवी देण्यात आली. महान द्रष्टे स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाने त्यांना प्रेरणा दिली. गुरुस्वामी सोमदेव यांच्या प्रभावाखाली ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध संघर्षात ते ओढले गेले. त्यांनी बिस्मिल यांना इटालियन देशभक्त मॅझीनी आणि इतर साथींच्या लिखाणाची ओळख करुन दिली. बिस्मिल १८ वर्षाचे असताना भाई परमानंद यांना देण्यात आलेल्या मृत्युदंडाची शिक्षा त्यांना बेचैन करून गेली.
 
परमानंद यांचे मित्र असलेल्या स्वामी सोमदेव यांचा प्रभाव त्यांच्यावर असल्याने त्यांना झालेल्या शिक्षेमुळे संतप्त होऊन त्यांनी हिंदीमध्ये मेरा जन्म ही कविता रचली. ज्या कवितेतून भारतावरील ब्रिटीश नियंत्रण काढून टाकण्याची वचनबद्धता समाजासमोर त्यांनी मांडली. पुढील वर्षी बिस्मिल यांनी शाळा सोडून काही मित्रांसह लखनौ दौरा करून १९१६ च्या लखनौतील काँग्रेसच्या अधिवेशनात हजेरी लावली. इथेच त्यांचा संपर्क ब्रिटिशविरोधी भूमिगत क्रांतीकारक संघटनेशी झाला. त्याचवर्षी त्यांनी ’अमेरिका को स्वाधीनता मिली’ हे पुस्तक प्रकाशित केले. ज्यामध्ये त्यांनी एखाद्या देशाला प्रगत होण्यासाठी राजकीय स्वातंत्र्य गरजेचे आहे आणि ते मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष सर्वात जास्त व्यवहार्य पर्याय आहे, अशी भूमिका मांडली.
 
१९१८ मध्ये स्वामी सोमदेव यांच्या नियोजनाने बिस्मिल आणि इतरांनी स्थापन केलेल्या मातृवेदी क्रांतीकारी संघटना आणि औरे येथील शिक्षक गेंदालाल दीक्षित यांची शिवाजी समिती यांनी प्रांतातील काही शक्तीशाली दरोडेखोरांशी संपर्क साधत संघटना मजबूत करण्यासाठी योजना आखली. त्यासाठी संयुक्त प्रांतातील म्हणजेच आत्ताच्या उत्तर प्रदेशातील इटावा, मैनपुरी, आग्रा, शाहजहानपूर जिल्ह्यातील तरुण संघटीत केले. २८ जानेवारी १९१८ रोजी बिस्मिल यांनी ’मैनपुरी की प्रतिज्ञा’ या कवितेचे पत्रक सर्व प्रांतात वाटले. १९१८ मध्ये तीन वेळा पक्षाच्या संघटना बांधणीसाठी कट करून निधी गोळा करण्याचे काम हाती घेण्यात आले. १९१८ च्या दिल्ली काँग्रेसमध्ये उत्तरप्रदेश प्रांताने बंदी घातलेली पुस्तके विकत असताना ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; पण ते फरार झाले. जेव्हा दीक्षित आणि बिस्मिल साथीदारांना घेऊन दिल्ली आणि आग्रा दरम्यान आणखी एका लुटमारीची योजना आखत असताना पोलिसांचे पथक आले. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. बिस्मिल यमुनेत उडी मारून पाण्याखाली पोहत निसटले. पोलीस आणि त्यांच्या साथीदारांना वाटले ते चकमकीत मरण पावले. दीक्षित आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आणि आग्रा किल्ल्यात ठेवण्यात आले. येथून दीक्षित दिल्लीला पळून जाऊन अज्ञातवासात गेले. सर्वांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्यात आला, जी घटना मैनपुरी कट म्हणून ओळखली जाते. 
 
१९२० मध्ये ’मैनपुरी कट’ खटल्यातील सर्व कैद्यांना मुक्त करण्यात आले, तेव्हा बिस्मिल शाहजहांपूरला घरी परतले. तोपर्यंत १९१९ ते १९२० त्यांनी उत्तर प्रांतातील विविध गावांमध्ये गुप्तपणे फिरत अनेक पुस्तके लिहिली. १९२१ मध्ये बिस्मिल हे अहमदाबाद काँग्रेसमध्ये सहभागी झाले. ज्येष्ठ काँग्रेस सदस्य प्रेम कृष्ण खन्ना आणि क्रांतीकारी अशफाक उल्ला खान यांसह त्यांना व्यासपीठावर स्थान मिळाले. त्यांनी मौलाना हसरत मोहानी यांच्यासोबत काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावत सर्वसाधारण सभेत आपली भूमिका मांडली. शहाजहानपूरला परतल्यावर संयुक्त प्रांतातील तरुणांना पुन्हा एकत्र करून सरकारशी असहकार आंदोलन चालू केले. फेब्रुवारी १९२२ मध्ये चौरी चौरा येथे काही आंदोलनकारी शेतकर्‍यांना पोलिसांनी ठार मारले. चौरी चौरा पोलीस स्टेशनवर लोकांनी हल्ला केला आणि २२ पोलिसांना जिवंत जाळले. महात्मा गांधींनी असहकार चळवळ तात्काळ थांबवण्याची घोषणा केली. असहकार चळवळीतून स्वातंत्र्य मिळणार नाही, या भूमिकेतून शचींद्रनाथ संन्याल, योगेशचंद्र चटर्जी, पं. रामप्रसाद बिस्मिल, सुरेशचंद्र भट्टाचार्य, विष्णू शरण दुबलिस, राजेंद्र काहिडी या प्रमुखांनी इतरांना बरोबर घेऊन ’हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेमार्फत क्रांतीकारी कार्य चालू केले. संस्थेचे एक प्रमुख कार्यकर्ते मन्मथनाथ गुप्त यांच्या संपादकत्वाखाली ’अग्रदूत’ या नावांची एक गुप्त पत्रिकाही निघत असे.
 
हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतीकारी संघटनेच्या कार्यासाठी लखनौजवळील काकोरी येथे रेल्वेतून नेण्यात येणारा खजिना लुटण्यासाठी पं. रामप्रसाद बिस्मिल यांनी एक काटेकोर योजना आखत ९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोरी स्टेशनजवळ दरोडा घातला. या दरोड्यात फक्त १० जणांनी भाग घेतला होता. या दरोड्यामुळे मोठा खजिना संघटनेला मिळाला; पण ब्रिटीश शासनाने या दरोड्यासाठी ४० हून अधिक क्रांतीकारकांना अटक केली. १८ महिन्यांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर पं. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्रनाथ लाहिरी यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ डिसेंबर १९२७ रोजी बिस्मिल यांना गोरखपूर तुरूंगात, अशफाक उल्ला खान यांना फैजाबाद तुरूंगात, ठाकूर रोशन सिंग यांना नैनी अलाहाबाद तुरूंगात फाशी देण्यात आले. राजेंद्र लाहिरी यांना १७ डिसेंबर १९२७ रोजी गोंडा तुरूंगात फाशी देण्यात आले होते. बिस्मिल यांचा मृतदेह हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कारासाठी राप्ती नदीत नेण्यात आला आणि त्या जागेला आता राजघाट म्हणून ओळखले जाते. १८ डिसेंबर १९९४ रोजी बिस्मिल या हुतात्म्यांच्या ६९ व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला उत्तर प्रदेशच्या तत्काळीन राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते शाहजहांपूर येथे अमर शहीद राम प्रसाद बिस्मिल स्मारक बांधून त्यांच्या संगमरवरी पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे विभागाने शहाजहांपूरपासून ११ किलोमीटर अंतरावर पंडित राम प्रसाद बिस्मिल रेल्वे स्टेशन बांधले. काकोरी येथेच काकोरी कट रचणार्‍यांचे स्मारक आहे. १९ डिसेंबर १९९७ रोजी बिस्मिल यांच्या जन्मशताब्दी वर्षात एक बहुरंगी टपाल तिकीट जारी केले. उत्तर प्रदेश सरकारने अमर शहीद पंडीत रामप्रसाद बिस्मिल उद्यान रामपूर जागीर गावाजवळ उभे केले आहे, तेथे बिस्मिल १९१९ मध्ये मैनपुरी कट रचल्यानंतर भूमिगत रहात होते. देशप्रेमाचे प्रतिक आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे स्वातंत्र्यलढ्यातील प्रेरणा स्थान म्हणून त्यांची ऐतिहासिक नोंद कोणीही विसरू शकत नाही.

Related Articles