व्हॉट्सऍप कट्टा   

शिवराज्याभिषेक हा फक्त महाराजांचा राज्याभिषेक नव्हता. तो महाराष्ट्राच्या एका संपूर्ण पिढीने नियतीशी आणि परकीय आक्रमणांशी मांडलेल्या भांडणाचा परिपाक होता. हे स्वराज्य मिळालं नव्हतं ते मिळवलं होतं भांडून, लढून, वेळप्रसंगी जीव वेचून. शिवराज्याभिषेक हा प्रत्येक मावळ्यानी आणि त्याच्या कुटुंबानी केलेल्या त्यागाचा स्वप्नपूर्ती सोहळा होता. तान्हाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, नेतोजी पालकर, बाजी पासलकर, शिवा काशीद, बहिर्जी नाईक, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, कोंडाजी फर्जंद, फिरंगोजी नरसाळ, हंबीरराव मोहिते, प्रतापराव गुजर असे अनेक ज्यांची नावं इतिहासाला माहीत आहेत तर असे असंख्य ज्यांची नावं इतिहासाने आपल्या पोटात दडवून ठेवली आहेत, अमूल्य रत्नांसारखी. त्या सगळ्यांची शिवराज्याभिषेकादिवशी स्वप्नपूर्ती झाली. सगळे सगळे भरून पावले. जे हयात होते ते सगळे रायगडावर आले होतेच; पण ह्या प्रवासात, ज्यांनी महाराजांच्या अंगावर धावून आलेल्या मृत्यूला आपल्या अंगावर घेतले ते सुद्धा आज रायगडावर होते. हा सोहळा महाराजांच्या डोळ्यातून बघत होते. महाराजांना सिंहासनाकडे जाताना प्रत्येक पावलाला या सर्वांची अगदी सर्वांची आठवण येत होती. असह्य भावना उचंबळून येत होत्या; पण महाराज तरीही खंबीर होते कारण हे स्वराज्य अजून वाढवायचं होतं, फुलवायचं होतं. मोघल, इंग्रज, पोर्तुगीज सर्वांनी शिवराज्याभिषेकाला आपले प्रतिनिधी पाठवून एकप्रकारे महाराजांना आणि त्यांच्या जीव की प्राण मावळ्यांना मानाचा मुजरा केला. 
 
हा महाराष्ट्र ..... हा संह्याद्री ..... हसला, सुखावला, अगदी तृप्त झाला. 
 
लखलखले ते अनंत सूर्य 
जसे उगवले दाहीदिशी 
मरगळ जणू ती पूर्ण झटकली 
उषा जाहली आजमिती 
 
सूर्य एक तो तान्हाजी अन 
एक भास्कर कोंडाजी 
किती भानू हे जवळी परी 
किती रवी ते आकाशी 
 
गंगा, गोदा आतूर झाल्या 
तरी प्रथम मान या रुधिराचा 
आज प्रचंड हा होम दिसे परी 
असंख्य आहुत्या प्राणांच्या 
 
स्वप्न पाहिले दशकापूर्वी 
आज फिरुनी तो दिन स्मरे 
किती सवंगडी, किती सोयरे 
अदृश्यातही स्पष्ट दिसे  
 
किती हेलकावे, किती हिंदोळे 
प्रवासापट हा बोलतसे 
क्षण एक अन अनंत चित्रे 
मनःपटलावर दाटी असे 
 
घालमेल ती जीवघेणी परी 
डोळ्यात पुन्हा ते स्वप्न दिसे 
भावनेतूनि त्वरा अलिप्त अन 
कर्तव्यास उभा योगी असे 
 
कवड्यांची ही अमूल्य माळ 
हेमकिरीट तो माथी वसे 
राजदंडा त्या धरुनी हाती 
चालता तो शिवशंभू दिसे 
 
विश्वनाथ हे हृदयस्थ होती 
चंद्र सूर्य जणू कर्णी डुले 
जणू भवानी तळपते हस्ती 
नजरेत त्या अंगार फुले 
 
झुकल्या ह्या गर्विष्ठ माना
वाकल्या त्या भगव्यापुढे   
आसनस्थ होता शिव तत्क्षणी 
तख्त झळाळी तेजामुळे... तख्त झळाळी तेजामुळे... 
- अनिरुद्ध वाळिंबे
-------------
जगण्याचा वीट येऊ नये म्हणून....
वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर ठेऊ नका डोळा
एकत्र या गोड बोला मार्ग निघतील सोळा
नाते संबध बिघडण्याचे हे एक मुख्य कारण
आपल्याच माणसाचं करू नये वस्त्रहरण
योग्य वाटे केल्यामुळे नाते टिकून राहातील
कार्य प्रसंगी बहीण-भाऊ जवळ जवळ येतील
दुःख, चिंता आणि क्लेश नक्की होतील कमी
आरोग्य उत्तम राहण्याची थोडी फार हमी
येणे जाणे खुंटले की माणूस विचार करतो
म्हणून तर आपला बी.पी. खाली वर होतो
डॉक्टर देतात गोळ्या पण विचार कसे जातील
ईसीजी मधल्या रेषा कशा पाहिजे तशा येतील ?
त्यातून पुढे छातीत कळ किंवा पॅरालिसिस
उगी कशाला चान्स देता शुगर नावाच्या घुशीस
पैसा अडका प्लॉट शेती करता कशासाठी
एक किंवा दोन लेकरं प्रत्येकाच्या पोटी
प्रॉपर्टीच्या कागदापेक्षा माणसं करावीत गोळा
नाती-गोती जपून ठेवावी करू नये चोळामोळा
क्वालिफाईड, गडगंज झालात म्हणे तुम्ही 
पुतणे ,भाच्चे सोडून देऊन करता टॉमी जिमी
कुत्रं प्रामाणिक असलं तरी बोलता येत नसतं
मन हलकं करण्यासाठी जिवंत माणूस लागतं
रिलेशन जपल्यामुळे गोळ्या होतील कमी
दीर्घ आयुष्य मिळण्याची होती एक हमी
भावाकडे जात जा आणि बहिणालाही बोलवा
वहिनीला मान देऊन सार्‍यांची मनं फुलवा
अरे वेड्या याच्यामुळेच नेहमी राहशील फिट
जगण्याचा तुला कधीच येणार नाही वीट
--
जीवनात आपला सल्लागार कोण आहे.....
हे फार महत्वाचे आहे....
पराक्रमी तर दुर्योधन पण होता 
मात्र विजय अर्जुनाचाच झाला!
कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता 
आणि अर्जुन श्रीकृष्णाचा....
--
पुण्यातील मॉलमधुन बिस्किटचा पुडा चोरताना पकडलेल्या महिलेविरुध्द खटला सुरू होता. 
न्यायाधीश: पुडयात दहा बिस्किटं होती, तेव्हा तुला दहा दिवस तुरुंगात राहावे लागेल. हे ऐकताच पती पुढे सरसावला...
न्यायाधीश महोदय, हिने एक किलो मोहरीचे पाकिटसुद्धा 
चोरले होते.

Related Articles