बंगळुरूत चेंगराचेंगरीत ११ ठार   

 

५० हून अधिक जखमी
 
विजयोत्सवाला गालबोट चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील घटना
 
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) विजयोत्सवात आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बुधवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमजवळ मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी उसळली होती. मात्र, या विजयोत्सवाला चेंगराचेंगरीचे गालबोट लागले असून, यात ११ जणांना प्राण गमवावे लागले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, ५० हून अधिक जखमी झाले आहेत.
 
तब्बल १८ वर्षानंतर आयपीएलचे विजेतेपद मिळविणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सत्कार सोहळा काल एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित केला होता. यावेळी संघाची मिरवणूकदेखील काढण्यात येणार होती. त्यासाठी चाहत्यांनी मैदानाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली.  
 
मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांनी केला. तसेच, न्यायालयीन चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दुर्घटनेत किती जणांचा बळी गेला याबाबत अद्याप अधिकृत माहिती नाही. मात्र, तपशील मिळाल्यानंतर माहिती देऊ,असे सांगितले.
 
प्रत्यक्षदर्शीच्या मते, काहींनी झाडांवरून, संरक्षक भिंतीवरुन मैदानात घुसण्याचा प्रयत्न केला. मृतांमध्ये लहान मुलीचा समावेश असल्याचे समजते. आरसीबीच्या विजयोत्सवाची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण झाडावर बसलेले दिसून आले. चाहत्यांची मोठ्या संख्येने गर्दी उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटक सरकारने आधीच विधान सौध ते चिन्नास्वामी मैदानापर्यंतची खुल्या बसमधून काढण्यात येणारी विजयी मिरवणूक रद्द केली होती. त्यानंतरही मैदानाबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यातच हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर चाहते इकडे-तिकडे धावू लागले. यातूनच चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही केला. 
 
उपमुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
 
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांनी गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने गोंधळ झाला असल्याचे सांगितले. तसेच, दुर्घटनेबद्दल माफी मागतो. आम्ही पाच हजारांहून अधिक कर्मचार्‍यांची या ठिकाणी व्यवस्था केली होती. मात्र, तरुणांचा मोठा उत्साह लक्षात घेता आम्ही त्यांच्यावर लाठीमार करू शकत नव्हतो, असे स्पष्ट केले. मी पोलिस आयुक्तांशी याबाबत चर्चाही केली, तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचापूसही केली आहे. या दुर्घटनेनंतर हा कार्यक्रम दहा मिनिटांतच आटोपल, असे सांगितले.
 
न्यायालयीन चौकशी करा : विजयेंद्र
 
आरसीबीच्या विजयाच्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. त्यावेळी ही घटना घडली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला असल्याचा दावा कर्नाटक भाजपचे प्रमुख विजयेंद्र केला. तसेच, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
 
बीसीसीआयकडून खेद 
 
विजयोत्सवाच्या तयारीतील त्रुटींबद्दल बीसीसीआयचे सचीव देवजीत सैकिया यांनी खेद व्यक्त केला आहे. चिन्नास्वामी मैदानाबाहेरील चेंगराचेंगरीत अनेक चाहत्यांचा मृत्यू झाला. तरीही संघ व्यवस्थापनाने क्रिकेटप्रेमींच्या असुरक्षितता आणि भावनांबद्दल सहानुभूती दर्शविली. सैकिया म्हणाले, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात विजय साजरा केला जातो. त्यावेळी योग्य खबरदारी, सुरक्षितता आणि सुरक्षेचे उपाय करणे गरजेचे असते. यामध्ये कुठेतरी चूक झाली आहे. आयपीएलच्या इतक्या शानदार अंतिम फेरीनंतर, ही घटनाघडणे निराशाजनक आहे. बार्बाडोसमध्ये भारताच्या टी-२० विश्वचषक विजयानंतर मुंबईत झालेली मिरवणूक योग्य पद्धतीने पार पडल्याचे सैकिया यांनी सांगितले. यापूर्वीही, आयपीएलचा विजयोत्सव झाला आहे, गेल्या वर्षी कोलकातामध्ये असा कार्यक्रम घेण्यात आला. पण तिथे काहीही घडले नाही. असे कार्यक्रम सुरळीत पार पडावे, यासाठी पोलिस आणि स्थानिक अधिकार्‍यांनी एकत्र काम केले पाहिजे, असे सांगतानाच यापुढे असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
निष्काळजीपणाचा फटका 
 
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही चेंगराचेंगरी झाली असा आरोप केला जात आहे. आरसीबीने तब्बल १८ वर्षांनी आयपीएलचा चषक जिंकला होता. त्यामुळे विजयोत्सव मोठ्या प्रमाणावर होणार, हे निश्चित होते. मात्र, प्रशासनाने योग्य काळजी आणि योग्य नियोजन केले नाही. मैदानावर मोफत प्रवेश असल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. नंतर ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. 
 
१४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू 
 
या दुर्घटनेत नववीत शिकणार्‍या १४ वर्षांच्या मुलीला प्राण गमवावे लागले आहे. आपल्या आवडत्या संघाच्या विजयोत्सवात सामील होण्यासाठी ती आई-वडिलांसह मैदानावर आली होती. चेंगराचेंगरीत ती चिरडली गेली आणि त्यामध्येच तिचा मृत्यू झाला. 
 
नेमके काय घडले...
 
आयपीएल विजेता आरसीबी संघ दुपारी बंगळुरुत दाखल झाला. 
विमानतळावर खेळाडूंच्या स्वागताला चाहत्यांची प्रचंड गर्दी.
चाहत्यांची गर्दी लक्षात घेत पोलिसांनी विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारली.
चिन्नास्वामी मैदानावर खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याला चाहत्यांना मोफत प्रवेश.
चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ३२ हजार.
मोफतच्या प्रवेशामुळे लाखो चाहत्यांची गर्दी केली. 
वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. 
नियोजनात आभाव, पोलिसांचा निष्काळजीपणा हा या घटनेला कारणीभूत ठरले.
 
अत्यंत दुःखद घटना : पंतप्रधान 
 
चिन्नास्वामी मैदानाबाहेरील चेंगराचेंगरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. बंगळुरूमधील दुर्घटना खूप दुःखद आहे. या दुःखद क्षणी, ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 
 
दुर्घटनेने विजयाचा आनंद हिरावला : सिद्धरामय्या
 
या वेदनादायी दुर्घटनेमुळे विजयाचा आनंद हिरावला आहे, अशा भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली. मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो आणि जखमी लवकर बरे होवो, अशी मी प्रार्थना करतो. गर्दीमुळे संघाला विजयी फेरी काढू दिली नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

Related Articles