प्रादेशिक, भाषिक संस्कृती जोपासणारी राज्येच प्रगती करू शकतील   

अजित अभ्यंकर यांचे प्रतिपादन

पुणे : स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना झाली. भाषिक अस्मिता व प्रादेशिक संस्कृती जपणारी दक्षिणेकडील राज्ये आजही प्रगती करताना दिसत आहेत. भाषा आचार व विचार प्रसाराचे माध्यम आहे. आपली मराठी भाषा, संस्कृती संपवली जात असताना आपण गप्प बसणे योग्य नाही. बंधुतेच्या तत्वाने त्याचा विरोध करून मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी केले. 
 
विश्वबंधुता साहित्य परिषद, रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वबंधुता दिनाच्या निमित्ताने आयोजित बंधुता काव्यमहोत्सवाच्या समारोपा- वेळी अजित अभ्यंकर बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, प्रा. भारती जाधव, प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजुरके उपस्थित होते. एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम झाला.  
 
अभ्यंकर म्हणाले, ज्यांच्या घामाने इमारती उभ्या राहता, त्यांना राहायला घर नाही. मात्र, राज्यकर्त्यांच्या मेहेरबानीने ठराविक लोक २० ते २५ मजल्याच्या बंगल्यात राहतात, हा विरोधाभास आजही कायम असून, ही आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आपण एकत्रितपणे लढा द्यायला हवा.
 
प्रा. डॉ. संजय नगरकर म्हणाले, सध्याच्या काळ भयानक आहे. जाती-जातीमध्ये उभ्या झालेल्या भिंती, वर्णभेद अयोग्य आहे. यातून बाहेर पडून चांगला समाज घडायचा असेल, तर बंधुतेचा विचार तळागाळात रुजणे खूप आवश्यक आहे. प्रकाश रोकडे, प्रा. भारती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अरुण आंधळे यांनी प्रास्ताविक केले. संगीता झिंजुरके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी आभार मानले.

Related Articles