विराट कोहलीला आनंदाश्रू अनावर   

अहमदाबाद : आयपीएल २०२५ च्या थरारक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करत आपल्या १८ वर्षांच्या वाटचालीला अखेर यशाची गोडी दिली. आरसीबीच्या या ऐतिहासिक विजयाने केवळ संघच नव्हे तर विराट कोहलीच्या भावना देखील अनावर झाल्या.
विजयानंतर विराट कोहली ढसाढसा रडू लागला. मैदानावर विजय साजरा करत असताना विराट मात्र मैदानावर गुडघे टेकून बसला आणि चेहरा खाली घालून अश्रूंना वाट मोकळी करून दिली. संपूर्ण कारकिर्दीत आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा करणार्‍या कोहलीसाठी हा क्षण अतिशय भावनिक होता.
 
विराटने २००८ पासून बंगळुरुसाठी खेळताना अनेक वेळा संघाला अंतिम टप्प्यावर नेले, मात्र ट्रॉफी कायम हुलकावणी देत राहिली. २०२५ मध्ये अखेर त्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यामुळेच त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू संपूर्ण क्रिकेटविश्वाच्या मनाला घर करून गेल्या. चाहत्यांसह सोशल मीडियावरही विराटच्या या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. 
 
हा क्षण फक्त ट्रॉफीचा नव्हता, तर १८ वर्षांच्या समर्पणाचं फळ होतं, असं अनेकांनी लिहिलं आहे. विराट कोहली हा जगातील एकमेव खेळाडू आहे जो आयपीएलच्या सुरुवातीपासून एकाच संघाशी जोडलेला आहे. १७ वर्षे त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु दरवर्षी तो कधी जिंकला नाही. आयपीएल  २०२५ मध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीचे स्वप्न सत्यात उतरले आणि तो आयपीएल चॅम्पियन बनला. आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात आरसीबी संघाचे मन तीनदा तुटले. २००९, २०११ आणि २०१६ मध्ये, आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला, परंतु प्रत्येक वेळी विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगत राहिले. २०२५ मध्ये, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाचे नशीब बदलले आणि त्यांनी पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली.

Related Articles