पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान   

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’मधील निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. लष्करी संघर्षात पाकिस्तान किमान दोन दिवस भारताला झुंजवण्याच्या प्रयत्नात होता. पण, भारताने केवळ आठ तासांत पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असे तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी मंगळवारी येथे सांगितले.
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागातर्फे आयोजित ’भविष्यातील युद्ध आणि युद्ध पद्धती’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, अर्थ व लेखा अधिकारी डॉ. चारूशीला गायके यावेळी उपस्थित होते.
 
चौहान पुढे म्हणाले, १० मे रोजी रात्री १ वाजता पाकिस्तानकडून भारतावर अनेक हल्ले करण्यात आले. त्यांचा उद्देश हा होता की, दोन दिवसांच्या युद्धाद्वारे भारतावर दबाव आणता येईल. मात्र, भारताने फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करत प्रभावी कारवाई केली. ज्या ऑपरेशनसाठी ४८ तासांचा अंदाज बांधला गेला होता, ते केवळ ८ तासांत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानने भारताशी चर्चा करण्याची विनंती केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.पहलगाम येथे दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूर हत्याकांड घडवून आणले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद थोपविण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले गेले. या मोहिमेमागील उद्देश पाकिस्तान सरकारच्या पाठबळाने चालणार्‍या दहशतवादी कारवायांना कठोर प्रत्युत्तर देणे हा होता. 
 
भारत आता दहशतीच्या सावलीत राहणार नाही. अण्वस्त्राच्या धमकीला भीक घालणार नाही, असे स्पष्ट करतानाच पाकिस्तानने आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी तातडीने थांबवावा, असा इशाराही दिला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे झालेल्या नुकसानापेक्षा मिळालेली निष्पत्ती महत्त्वाची आहे. सैन्य दलाकडे असलेल्या सक्षम प्रणालीमुळे यशाची खात्री होती, असेही चौहान यावेळी म्हणाले.
 
पहलगाममधील हत्याकांड धर्माच्या नावाखाली करण्यात आले. भारत हा जगातील सर्वाधिक दहशतवादी हल्ल्यांचा बळी ठरलेला देश आहे. आतापर्यंत सुमारे २० हजार नागरिक दहशतवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर याने पहलगाम हल्ल्यापूर्वी हिंदू धर्माबाबत गरळ ओकली. त्यानंतर दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे हा योगायोग म्हणता येणार नाही, असेही चौहान यावेळी म्हणाले.
 
अण्वस्त्राच्या धमकीला भारत बळी पडणार नाही
 
भारत कधीही दहशतीच्या सावलीत राहणार नाही किंवा अण्वस्त्रच्या धमकीला बळी पडणार नाही. भारत व पाकिस्तान दोघांनीही लष्करी क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संघर्षाचा धोका अधिक होता. पण, धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही, असे चौहान यांनी स्पष्ट केले.
 
आता युद्धक्षेत्र अभूतपूर्व विस्तारले आहे. जमीन, सागरी क्षेत्र या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच अवकाश, सायबर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र, सेन्सर्स, प्रगत साहित्य, हायपरसोनिक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मोठा डाटा अशा अनेक क्षेत्रांपर्यंत युद्धाचा विस्तार झाला आहे. लष्करी कारवायांमधील पहिली क्रांती ही हाताने युद्ध करण्याशी संबंधित होती, जी जमिनीवरील आणि हवाई गतिशीलतेतील प्रगतीमुळे घडली. दुसरी क्रांती नेट-केंद्रित होती, ज्यामध्ये माहिती अनन्यसाधारण महत्त्वाची बनली. आधी माणसा-माणसांत युद्ध व्हायचे. आता आपण अशा वळणावर आहोत, जेथे मानव आणि यंत्र यात युद्ध होऊ शकते आणि आगामी काळात यंत्र विरूद्ध यंत्र असे युद्ध पाहायला मिळेल, असेही चौहान यांनी सांगितले. 
 

Related Articles