कुटुंब म्हणून आम्ही एकत्र : अजित पवार   

बारामती,(प्रतिनिधी) : कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. विचारधारा वेगळी असली तरी घरगुती कार्यक्रमांसाठी आम्ही एकत्र येतोच, अशी प्रतिक्रिया  दोन्ही पवार एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
 
अजित पवार म्हणाले, साडेसात हजार टनांचे क्रशिंग युनिट असताना प्रत्यक्षात साडेनऊ हजार टनांची गाळप झाली. २००० टन अधिक गाळप कसे झाले, यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित होतो, अशी कोपरखळी विरोधकांना लगावत यानिमित्ताने राज्य सरकारने ठरवले आहे की, यापुढे सहकारी तत्वावर कोणालाही भागभांडवल राज्य सरकार देणार नाही असेही व्यक्त केले. ज्यांना सहकारी साखर कारखाना काढायचा असेल त्यांनी स्वतःच्या हमीवर तो सुरू करावा. शेतकर्‍यांनी एकत्र येऊन कारखाना चालवायचा असेल तर ते पाहावे, पण राज्य सरकार यापुढे सरकार भागभांडवल देणार नाही.
 
विरोधकांवर टीका करताना पवार म्हणाले, आमचे विरोधक कारण नसताना शेतकर्‍यांची दिशाभूल करतात. मागच्यावेळी माळेगाव कारखान्याने राज्यात सर्वात जास्त भाव दिला आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपावर बोलण्यासारखे काहीच नाही, असे व्यक्त केले. लाडकी बहीण योजनेबाबत अर्थमंत्री घोटाळा करीत असल्याचा आरोप केला जातोय. पण मी कशाला घोटाळा करेन? सुरुवातीला अर्ज मागवले, तेव्हा अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा होती. निवडणूक जवळ असल्याने वेळ कमी होता, त्यामुळे काही महिलांना वगळण्यात आले. उत्पन्न मर्यादेच्या आधारेच ही प्रक्रिया पार पडली आहे.शिवसेनेतील अंतर्गत नाराजीबाबत विचारले असता पवार म्हणाले, शिवसेनेचे एकनाथ शिंदे पाहतील, राष्ट्रवादीचे मी पाहीन, आणि आमच्या सगळ्यांचे देवेंद्र फडणवीस बघतील. 

Related Articles