अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची तरुण पिढीला माहिती व्हावी   

पुणे : आपल्याला शिकवल्या गेलेल्या इतिहासात मुघल गेल्यावर थेट ब्रिटिश आले आणि राज्य केले असे सांगितले जाते. पण ते चुकीचे आहे. दरम्यानच्या १०० ते १२५ वर्षात वेगवेगळ्या स्वरूपात ठिकठिकाणी राज्यकारभार सुरू होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्ष उत्कृष्ट कारभार चालवला. त्यांच्या कारभारात सामान्य माणूस सर्वप्रथम होता. अहिल्यादेवी महाराणी होत्या. त्यांच्या नावाने राज्यात अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य तरुण पिढीला माहिती व्हायला हवे, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
 
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ’युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे आमदार व महासचिव विक्रांत पाटील, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने, आमदार शंकर जगताप, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, योगेश मेंद, महिला शहराध्यक्ष निवेदिता एकबोटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष करण मिसाळ, कुणाल टिळक, संदीप सातव आदी उपस्थित होते. याप्रसंगी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या महिलांचा सन्मान करण्यात आला.
 
देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशातील पुण्यस्थळे आणि शक्तीस्थळे, घाटांचे पुनर्जीवन करण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच आज सर्व ज्योतिर्लिंग शाबूत आहेत. अनेक चांगले उत्कृष्ट जलशास्त्र वापरून जलसंधारणाचे काम त्यांनी केले. एक कर पद्धत लावून सामान्यांना दिलासा दिला. योग्य दुष्काळ नियोजन केले. राज्यकारभार चालवताना अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्याचे काम त्यांनी केले. 

Related Articles