वेगवेगळ्या उपायांनी मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करणे शक्य   

पुणे बालपुस्तक महोत्सवातील परिसंवादात सूर

पुणे : स्क्रीनवर मिळणारा तात्पुरता आनंद टाळून मुलांनी दीर्घकालीन आनंददायक पर्याय स्वीकारावेत. वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे आणि घरगुती वस्तूंचा वापर करून मुलांना गुंतवून ठेवता येते. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम कमी करणे शक्य आहे, असा ठाम सूर पुणे बालपुस्तक महोत्सवात आयोजित ‘स्क्रीन टाइमचा राक्षस’ या परिसंवादात उमटला.
 
राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कला क्रीडा मंच येथे हा परिसंवाद पार पडला. यामध्ये लेखिका स्मिता पाटील वळसंगकर, शिक्षणतज्ज्ञ अर्चना कुडतरकर आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. श्रुती पानसे यांनी सहभाग घेतला. परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रसाद मिरासदार यांनी केले.
 
स्मिता पाटील वळसंगकर म्हणाल्या, स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी सर्वप्रथम कुटुंबातील सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत. मुले खेळली, अभ्यास केला आणि झोप पूर्ण झाली, कीच स्क्रीन वापरणे योग्य ठरेल. झोपेपूर्वी एक तास स्क्रीनपासून दूर राहणे, जेवणावेळी मोबाईल आणि टीव्ही टाळणे, कुटुंबासोबत गप्पा मारणे, वाचन करणे किंवा एकत्र खेळणे असे पर्याय स्वीकारल्यास स्क्रीनपासून दूर राहता येते.
 
अर्चना कुडतरकर म्हणाल्या, मुलांनी ‘कंटाळा आलाय’ असे सांगितले की, पालकांनी त्याचा सकारात्मक अर्थ लावावा. कारण हेच वाक्य मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवण्याची संधी असते. अशावेळी चित्रकला, कोडी, हस्तकला, वाचन असे विविध उपक्रम राबविता येतात.
 
डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितले की, मोबाईल गेम्स हे अतिशय हुशारीने डिझाइन केलेले असतात. मुलांची आवड, रंगसंगती, संगीत याचा विचार करून ती तयार केली जातात. त्यामुळे मुले त्यात सहज अडकतात. मात्र, सतत गेम खेळल्याने मेंदूची निर्णय क्षमता कमी होण्याचा धोका असतो. म्हणूनच, मोबाईलवरील गेम्स मर्यादित वेळेत खेळून बाजूला ठेवायला शिकवणे गरजेचे आहे. पालकांच्या सक्रिय सहभागाने आणि योग्य मार्गदर्शनाने मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवणे शक्य असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अत्यावश्यक  असल्याचा सूर परिसंवादात उमटला.
 

Related Articles