मुंबईत ७५ वर्षांनंतर मान्सूनचे लवकर आगमन   

 

मुंबई : मुंबईत यंदा तब्बल ७५ वर्षांनंतर मान्सूनचे (नैऋत्य मोसमी वारे) लवकर आगमन झाले, अशी माहिती हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली. याआधी, १९५६ मध्ये २९ मे रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता. १९६२ आणि १९७१ मध्येही तो त्याच तारखेला आला होता, असेही त्या म्हणाल्या.यंदा केरळमध्ये २००९ नंतर म्हणजेच, तब्बल १६ वर्षांनंतर मान्सूनचे २४ मे रोजी आगमन झाले. त्याआधी, २००९ मध्ये २३ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता. विशेष म्हणजे, यंदा चोवीस तासांत मान्सून केरळमधून महाराष्ट्रात दाखल झाला. 
 
सामान्यतः मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. तर, ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापत असतो. १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतो. 
 
काल मुंबई आणि उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. पुढील २४ तासांत मुंबई आणि आसपासच्या भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. रविवारी पुणे जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपून काढले होते. बारामती, सोमेश्वरनगर, भिगवण परिसरात ढगफुटी झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यात पूरसदृश्य परिसराला काल भेट दिली. तसेच, आढावा घेतला. बारामतीसह इंदापूर, दौंड तालुक्यात रविवारी प्रथमच मे महिन्यांत मुसळधार पाऊस झाला. बारामती आणि इंदापूरमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची दोन पथके दाखल झाली अहे. परवाच्या पावसात इंदापूरातील ७० गावांमध्ये तर बारामतीतील १५० घरांमध्ये पाणी शिरले होते. या रहिवाशांना तातडीने सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यात आला, असे प्रशासनाने सांगितले.
 
इंदापूरजवळील पुणे-सोलापूर महामार्ग पावसामुळे दोन तास बंद ठेवावा लागला होता. भिगवणजवळ एक मोटार पावसाच्या पाण्यात वाहून गेली होती. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 

Related Articles