रावळपिंडीचे लष्करी मुख्यालयआता इस्लामाबादला हलविणार   

भारताच्या हल्ल्याने हादरलेल्या पाकिस्तानचा निर्णय

इस्लामाबाद : भारताच्या आक्रमक सैन्य कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने आता रावळपिंडीतील चकला येथील लष्करी मुख्यालय राजधानी इस्लामाबादला हलविण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
भारतीय हवाई दलाने इस्लामाबाद पासून १० किलोमीटवरील नूर खान हवाई तळावर १० मे रोजी भीषण हल्ला केला होता. लष्करीदृष्ट्या हे ठाणे महत्त्वाचे असून ते लष्करी मुख्यालयाच्या जवळच आहे. तेथे वाहतूक विमाने, पाहणी यंत्रणा आणि लढाऊ विमानांच्या ताफ्यात इंधन भरण्याची व्यवस्था आहे. रावळपिंडीजवळच्या नूरखान हवाई तळावर भारतीय हवाई दलाने भेदक मारा केला होता. 
 
तेथे ड्रोन हल्ला झाल्यानंतर भीषण स्फोट झाले आणि आगीच्या ज्वाळा भडकल्या होत्या., त्यात तळाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआयने आता लष्करी मुख्यालयच हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील बातम्या समाज माध्यमांवर फिरू लागल्या आहेत. पाकिस्तानी लष्कराने मुख्यालय आणि लष्कर प्रमुखांचे निवासस्थान इस्लामाबदला हलविण्यास सुरूवात केली आहे. लष्करी मुख्यालय आणि परिसराची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे तसा निर्णय घेण्यात आला असावा, असा अंदाज भारतीय गुप्तहेर संस्थांचा आहे. 

उपग्रहांनी टिपली हानीची दृश्ये

भारतीय हवाई दलाच्या भेदक हल्ल्यात तळाचे आणि तळावरील लष्करी साहित्याचे प्रचंड नुकसान झाले. त्याच्या नुकसानीची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत. त्यात तळावरील दोन लष्करी वाहनांचे नुकसान झाल्याचे दिसते. चीनची कंपनी मिझाव्हिजन आणि भारतीय कावा स्पेस शोच्या छायाचित्रात नुकसान झाल्याचे दिसले. इंधनाची वाहतूक करणारी मालमोटार नष्ट झाल्याचे आणि गोदामाच्या छताला भगदाड पडले आहे. धावपट्टीवर त्यांचे अवशेष विखुरलेले दिसले. आता लष्करी मुख्यालयाबरोबरच  चीनने दिलेली एचक्यू ९ आणि एवाय ८० हवाई संरक्षण यंत्रणा देखील इस्लामाबादला हलवली जाणार आहे. 

Related Articles