वाचक लिहितात   

शस्त्रसंधीने सैन्याचा अवसानघात
 
आरपार लढाईचा इरादा असताना अचानकच्या शस्त्रसंधीच्या निर्णयाने सैन्यदलाचा अवसानघात तर झालाच त्याबरोबरच युद्धज्वराने उन्मादी बनलेल्या जणू काही युद्धभूमीवरच असल्याच्या आविर्भावात असलेल्या असंख्य भारतीय पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड झाला! दोन्ही राष्ट्राच्या राजनैतिक पातळीवर वाटाघाटी होऊन तो व्हायला हवा होता! मात्र तसे न होता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या अनाहूत (?) हस्तक्षेपाने वा मध्यस्थीने शस्त्रसंधी सारखा अवसानघातकी निर्णय व्हावा हे आपल्यासाठी निश्चितच नामुष्कीजनकच!  तथापि भयंकर अनर्थ टळला गेल्याच्या पार्श्वभूमीवर शस्त्रसंधीचे स्वागतच करायला हवे! ’युद्धात कोणीही जिंकत नसते, फक्त मानवता पराभूत होते’ हे वचन खरेच आहे. प्रत्यक्षात लढणार्‍यांचा संघर्ष मात्र अत्यंत कष्टप्रद आणि भयंकर असतो ! युद्धांमुळे जीवित व वित्त हानीने विध्वंसच होतो! परस्पर राष्ट्रांचे अपरिमित नुकसान होत असते! त्यामुळेच मानवी कल्याण साधायचे तर युद्धाच्या मार्गाने जायचे की बुद्धाच्या मार्गाने जायचे याचा सारासार विचार आता अवघ्या जगाने करायला हवा! 
 
श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)
 
जनरलचे डबे वाढवा
 
सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू आहे. रेल्वेला प्रचंड गर्दी होत आहे. रेल्वेच्या सर्व गाड्यांचे आरक्षण ‘वेटींग’ असल्याने ऐनवेळी प्रवासाची तयारी करणार्‍यांना आरक्षित तिकीट मिळत नाही. तिकीट  न मिळाल्याने जनरल तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगोदरच तिकीट आरक्षण करून प्रवास करणार्‍यांना जनरल तिकीट धारक प्रवाशांमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो त्यातून वादाचे प्रसंग निर्माण होतात. काही वेळा हा वाद विकोपलाही जातो. हे टाळायला हवे त्यासाठी रेल्वेने जनरल डब्यांची संख्या वाढवायला हवी. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना जनरलचे दोन डबे असतात. काही गाड्यांना तर एकच जनरलचा डबा असतो. जनरल डब्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. प्रवाशांना डब्यात शिरताही येत नाही त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने आरक्षित डब्यातून प्रवास करावा लागतो. रेल्वे प्रशासनाने जर मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरलचे डबे वाढवले तर प्रवाशांना जनरल डब्यातच जागा मिळेल. प्रवाशांना जागा मिळाली तर हे प्रवाशी आरक्षित डब्यात शिरणार नाहीत. 
 
श्याम ठाणेदार, दौंड जि. पुणे 
 
युनूस यांची सत्ताकांक्षा
 
’लोकशाहीचे शत्रू ’ हा बांगलादेशचे हंगामी अध्यक्ष महंमद युनुस त्यांच्यावरील अग्रलेख महंमद युनुस यांची सत्ताकांक्षा अधोरेखित करणारा आहे. महंमद युनुस ह्यांना अर्थशास्त्रातील नोबेल मिळविले होते पण त्यांना देश चालविणे जमेल हा कयास पूर्णपणे खोटा ठरला आहे. जागतिक किर्तीची व्यक्ती जेव्हां धर्मांधांच्या कच्छी लागते व इतर धर्मीयांच्या दुःखाकडे डोळेझाक करते तेव्हां त्या व्यक्तीचे मातीचे पाय दिसून येतात. आपण हंगामी अध्यक्ष आहोत हे युनुस विसरून गेले आहेत आणि देशातील लोकशाहीला सुरूंग लावला आहे. अशावेळी बांगलादेशी अल्पसंख्याकच नव्हे तर सर्वच नागरिकांचे जीणे अत्यवस्थ होण्याची लक्षणे दिसत आहेत.
 
माया भाटकर, पुणे 
 
चोर सराईत, पोलिस सुस्त
 
पुणे शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसा ढवळ्या चोर्‍या होऊ लागल्या  आहेत !  गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या पिशवीतील पैसे आणि दागिने,  वस्तू चोरटे लंपस करू लागले आहेत. एका महिलेच्या पाटल्या बस मध्येच चोरांनी कापून नेल्या. रात्रीच्या घरफोड्या होत आहेत. अंमलदारी किंवा पोलिस प्रशासनाचा मागमूसही दिसत नाही. पुण्यात वाहतूक कोंडी होते परंतु या कोंडीमध्ये चोरटे सापडलेले पकडलेले दिसत नाहीत. चोरटे सराईत झाले आहेत आणि पोलीस सुस्त!  
 
गिरीश भागवत, तळेगाव दाभाडे
 
त्या मंत्र्यावर खटला भरा
 
’ऑपरेशन सिंदूर’ मध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावणार्‍या कर्नल सोफिया कुरेशी यांचा ’ अतिरेक्यांची बहिण ’ असा वादग्रस्त उल्लेख केल्याप्रकरणी  मध्य प्रदेशच्या मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. एकीकडे भाजप लष्कराच्या सन्मानार्थ देशभर ’ तिरंगा यात्रा ’ चे आयोजन करत आहे तर दुसरीकडे मध्य प्रदेश सरकारमध्ये मागील कैक वर्षापासुन मंत्री असलेला विजय शहा नामक व्यक्ती महिला लष्करी अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तींची ’ अतिरेक्यांची बहिण ’ असा उल्लेख करतो हे कसे ? इतरांना देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणार्‍या भाजप पक्षास अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पहावी लागते ? वास्तविक केंद्र सरकारी धोरणांविरोधात आंदोलन करणार्‍यांवर केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकार उठता बसता देशद्रोहाचा खटला भरते पण स्वपक्षाचे सरकार असलेला एक मंत्री भारतीय लष्करी अधिकारी पदावर असलेल्या एका व्यक्तीचा अपमान करते पण मोदी या मंत्र्यांचा साधा राजीनामा देखील घेत नाहीत ? मोदी सरकारने विजय शहरांवर देशद्रोहाचा खटला का भरू नये ? कर्नल सोफिया कुरेशी त्यांची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभूमी ही भारतीय लष्कर सेवेची आहे हे विजय शहा आणि त्यांच्या सारख्या उथळ धर्मवाद्यांनी आणि ढोंगी नवराष्ट्रवाद्यांनी इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. 
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे 

Related Articles