वाचक लिहितात   

भाजपचा प्रसिद्धीचा सोस

भारतीय लष्कराने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या धडक कारवाईमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले खरे; पण या मोहिमेचा वापर करुन घेण्यात प्रसिद्धीलोलुप मात्र, आघाडीवर राहिले. अनेक चित्रपटनिर्मात्यांनी ’ऑपरेशन सिंदूर’ या शीर्षकासाठी नोंदणी केली. एकाने तर तसे पोस्टरच रिलीज केले. वृत्तवाहिन्या तर पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवण्याच्या बातम्यांचा रतीब टाकत होत्या. त्यातच भाजप आता याच मोहिमेला केंद्रित करुन दहा दिवसाची तिरंगा यात्रा काढणार आहे. समाजमाध्यमांवरील ट्रोलर्सना तर ऑपरेशन सिंदूरनंतरची शस्त्रसंधी नको होती. ती जाहीर करणार्‍या परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना व त्यांच्या कुटुंबियांना अर्वाच्य भाषेत ट्रोल करुन भंडावून सोडले. मध्यप्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह म्हणाले की, ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच बहिणीच्या मदतीने धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी संबोधित करताना भारतीय सैन्यदलाच्या सामर्थ्याविषयी भाष्य केले आणि त्यांचे कौतुकही आदमपूर येथील हवाई तळाला प्रत्यक्ष भेट देऊन केले. पंतप्रधानांचाच कित्ता गिरवत भारतीयांनी भारतीय सैन्यदलाविषयी अभिमानाची भावना प्रकट केली असताना प्रसिद्धीलोलुपांचे वागणे मात्र खटकले.

दीपक गुंडये, वरळी.

कॅशलेस उपाचारामुळे दिलासा

देशात रस्ते अपघात ही चिंतेची बाब बनली आहे. या पार्श्वभूमीवर देशात रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर दिड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. यासाठी कॅशलेस उपचार योजना २०२५ पासुन मान्यता प्राप्त  कोणत्याही रूग्णालयामध्ये दिड लाखांपर्यंत कॅशलेस उपाचाराची सुविधा मिळणार आहे. ही योजना स्तुत्य आहे. रस्ते अपघात झाल्यास जखमींवर  योग्य वेळेत उपचार होत नाही. त्यामुळे जखमींचे मृत्यू होण्याचे  प्रमाण अधिक आहे. कॅशलेस योजनेमुळे दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारची कॅशलेस उपचार योजना स्तुत्य आहे.

संतोष शिंदे, काष्टी, ता. श्रीगोंदे 

‘समृद्धी’वर चोरांचा धुमाकूळ

समृद्धी महामार्ग अत्यंत सुरक्षित, समृद्धी महामार्ग विना अपघाताचा, समृद्धी महामार्ग कमी वेळेचा, समृद्धी महामार्ग विना चोरांचा अशी अनेक संबोधने असणार्‍या समृद्धी महामार्गवर आता वाहन धारकांना लुटणार्‍या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत. लग्‍न समारंभ आटोपून जाणार्‍या डॉक्टर दाम्पत्याला नुकतेच लुटण्यात आले आहे. या समृद्धी महामार्गवर 24तास महामार्ग पोलीस असताना हे कसे घडते? या बाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी असे वाटते. या महामार्गची सुरक्षितता पोलिसांच्या कडे असताना व 24 तास पोलीस वाच असतांना नंबर प्लेट नसलेली कार या समृध्दीकर कशी धावते ? या बाबत ही चौकशी व्हावी व समृध्दीवरून जाणार्‍या वाहनांना या मार्गावर अधिकची सुरक्षितता उपलब्ध करून द्यायला हवी.

धोंडीरामसिंह राजपूत, संभाजीनगर

शस्त्रसंधीबाबत खुलासा व्हावा

पाकिस्तानातील दहशतवाद्यांना आपल्या बळाची जाणीव करून देण्यासाठी भारताने ‘सिंधू करार’ रद्द केला, वाघा-अटारी सीमा बंद केली, पाकिस्तानशी व्यापार खंडित केला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ आखत दहशतवाद्यांची नऊ स्थळे उध्वस्त केल्यावर पाकिस्तानने अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर शस्त्रसंधी करण्यास होकार दिला. अमेरिकन अध्यक्षांनी ट्विट करीत भारत-पाक मध्ये शस्त्रसंधी झाली, असे जाहीर केल्यावर अनेक भारतीय नेत्यांनी त्याविरोधात आपला विरोध स्पष्ट शब्दांत व्यक्‍त करतांना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करारानुसार दोन्ही देशांमधील प्रश्‍न चर्चा वाटाघाटीने सोडवावा, तिसर्‍या देशाने किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांत मध्यस्थी करणे किंवा हस्तक्षेप करणे, हे त्या द्विराष्ट्रीय कराराच्या विरोधात आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या. दोन देशांतील घडलेल्या घटनांनंतर खुल्या चर्चेने दोन्ही देश समस्या सोडवू शकले असते. कारण त्या दोनही देशांमधील अंतर्गत बाबी असल्याने या वादात तिसर्‍या राष्ट्राने मध्येच हस्तक्षेप करणे या कारणांनी सबंधितांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे शस्त्रसंधी करण्यास येऊन युद्ध संपल्याच्या घोषणा देण्यात आल्या असल्या तरीही त्यापश्चात देशांतर्गत नेत्यांमध्ये काही शाब्दिक वाद मतभेद निर्माण झाले आहेत, त्यांना उत्तर देणे सरकारपुढील डोकेदुखी वाढली आहेे. म्हणूनच, सरकारकडून शस्त्रसंधीसंबंधी विस्तृत खुलासा करून देशातील नागरिकांना आणि त्यांचे प्रतिनिधी शांत होऊ शकतील, अशी जाहीर मते उघड करावीत असे वाटते.

राजन पांजरी, जोगेश्‍वरी.

 

Related Articles