व्हॉट्सऍप कट्टा   

अहंकारी राजाला धडा

एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच, आपल्या शक्ती आणि रूपावरही तो अहंकार बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याचा गर्व अधिक वाढायचा. तो इतरांना तुच्छ लेखत असे, त्यांचा अपमान करत असे. दुसर्‍याला कमी लेखण्याचा त्याचा स्वभाव होता. यामुळे त्याच्या राज्यातील लोक त्याच्यावर नाराज होते.
 
त्या राज्यातच एक विद्वान पंडित होता. त्याने राजाला योग्य धडा शिकवण्याचे ठरवले. एके दिवशी तो राजाच्या दरबारात गेला आणि त्याला नमस्कार केला. मात्र, राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कार केला नाही. उलट, गर्वाने विचारले, बोला पंडित महाराज, तुम्हाला काय मदत हवी? काय मागायचे असेल ते मागा-धन, सोनं, जमीन, धान्य, जे काही हवे असेल ते मागून घ्या.
 
पंडित राजाकडे पाहून मोठ्याने हसू लागला. राजाला आणि दरबारातील लोकांना त्याच्या हसण्याचे कारण समजले नाही. काही वेळाने हसणे थांबवून पंडित म्हणाला, राजन, तुम्ही मला काय दान देणार? तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही!
 
हे ऐकून राजा संतापला. सैनिक पंडिताला मारण्यासाठी पुढे सरसावले, पण सेनापतीने त्यांना थांबवले. त्याने पंडिताला विचारले, तुम्हाला आणखी काही बोलायचे आहे का?
त्यावर पंडित शांतपणे म्हणाला, महाराज, जरा शांतपणे विचार करा. तुमचा जन्म तुमच्या इच्छेने झालेला नाही. मग, रूप, सौंदर्य, आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते? आईवडिलांनी तुम्हाला जन्म दिला, म्हणून तुम्ही या जगात आहात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात. खजिन्याबद्दल बोलायचे झाले, तर धन हे करातून गोळा केलेले आहे, म्हणजेच प्रजेचे देणे आहे. राज्य हे तुम्हाला वंशपरंपरेने मिळालेले वरदान आहे. आणि तुमच्या शरीरातील प्राणदेखील तुमचे नाहीत; तेही ईश्वराचीच कृपा आहे. जेव्हा या सार्‍या गोष्टी दुसर्‍यांकडूनच मिळालेल्या आहेत, तर तुम्ही मला काय दान देणार? आणि दिलेल्या गोष्टींचा गर्व करण्याचे कारण काय? हे ऐकून राजा स्तब्ध झाला. त्या दिवसापासून त्याने गर्व सोडून दिला.
 
तात्पर्य : जे आपले नाही, त्याचा गर्व करणे व्यर्थ आहे.
------------
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर तो मोती होतो, थेंब तोच असतो पण फरक फ़क्त सोबतीचा असतो..!
 ------------
दोन मद्यपी रस्त्याने चालत असतात. अचानक एक जण म्हणतो, मी आता मुख्यमंत्री होणार हाये!
दुसरा म्हणतो, काय? पहिला म्हणतो, हो...
माझ्या बाबतीत वातावरण एकदम अनुकूल हाये.
दुसरा म्हणतो, मी राजीनामाच नाही दिला तर
तू मुख्यमंत्री होणार कसा!

सत्संगाचा परिणाम

एका गावात एक चोर आणि त्याचा मुलगा राहत होता. वडिलांनी खूप चोर्‍या केल्या होत्या. त्यांचा शेवट जसा जवळ आला तसे त्यांनी मुलाला जवळ बोलावून घेतले आणि सांगितले की, ’काय वाटेल ते होऊ दे पण कोणत्याही प्रवचन किंवा कीर्तनाच्या वाटेला चुकूनही जाऊ नकोस’. त्यांनी मग प्राण सोडले.मुलानेही हा उपदेश मनापासून पाळला पण त्यामागील कारण त्याला कळले नाही. एके दिवशी जंगलातून पळून गावाकडे येत असताना चुकून एका मंदिराच्या पाठीमागे तो आडोश्याला लपला. त्या मंदिरात एका महाराजांचे प्रवचन चालू होते. प्रवचनात त्यांनी एक कथा निवडली होती. त्यातील एकाच वाक्य ह्याचा नकळत कानावर पडले. ते म्हणजे ’देवांची सावली पडत नाही’. ह्याने ते मुद्दाम ऐकले नव्हते तरी त्याच्या डोक्यात ते चांगलेच भिनले.
 
नेमके त्याच वाटेवर राजाचे सैनिक त्याला आडवे आले आणि त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. बरेच दिवस खूप त्रास देऊनही, खुप मार खाऊनही याने गुन्हा कबूल केला नाही तेंव्हा राजा चिंतीत झाला आणि त्याने सरदारांची सभा बोलावली आणि चोराबद्दल सांगितले व उपाय सुचविण्याबद्दल सांगितले. एका सरदाराने शेवटी एक उपाय सुचविला. तो म्हणाला हा कशाला घाबरत नाही किंवा कशाला बधत नाही तेव्हा याला देवाची तरी भीती घालू आणि ह्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेवू. मग एका सुंदर स्त्रीला खुपसे दागदागिने घालून देवीच्या रुपात सजविण्यात आले आणि ह्याच्या समोर पाठविण्यात आले. तुरुंगात सर्वत्र अंधार होता आणि फक्त थोडा उजेड या स्त्री वर पाडण्यात आला. 
 
चोराने पाहिले एक देवी आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला गुन्हा कबूल करण्यास सांगत आहे. पण ह्याच वेळी त्याला नेमके प्रवचनातील ’देवांची सावली पडत नाही’ हे वाक्य आठवले आणि त्याचा समोरील देवीची सावली पडलेली त्याला दिसली. त्याच बरोबर त्याला कळले कि... ही देवी नाही माणूस आहे. 
त्याला कळून चुकले आपण एकदा प्रवचन चुकून ऐकले तर आपल्याला इतका फायदा झाला. मग ही लुटमार कशाला? चोरी कशाला? त्यापेक्षा चांगला मार्ग पत्करून जीवन जगण्याचा त्याने निश्चय केला.
 
तात्पर्य : चांगले विचार ऐकल्याने, चांगली संगत केल्याने माणसाला चांगले वागण्याची प्रेरणा मिळते.
-------
हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका माणसाने वेटरला हाक मारली, ‘ए वेटर, हे बघ, या वरणात बटन निघाले.’
वेटर काही न बोलता टेबलाजवळ आला आणि चमच्याने वरण ढवळू लागला. तो माणूस चिडून त्या वेटरला म्हणाला,
‘अरे, हे काय करतो आहेस ?’ त्यावर तो वेटर म्हणाला,
‘या बटनाबरोबर सुई-दोराही होता, तो शोधतोय!

Related Articles