केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर   

राज्याचा दहावीचा ९६.६१  तर बारावीचा ९०.६८ टक्के निकाल

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यात बारावीत उत्तीर्णांचे प्रमाण ८८.३९ टक्के, तर दहावीत उत्तीर्णांचे प्रमाण ९३.६६ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये किंचित वाढ झाली असून, राज्यात बारावीतील उत्तीर्णांचे प्रमाण हे ९०.६८ टक्के, तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे आहे.
 
‘सीबीएसई’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. गेल्या वर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ९३.६० टक्के, तर बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ८७.९८ टक्के होते. त्यामुळे दहावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.०६ टक्के, तर बारावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली. बारावीसाठी राज्यातून ३४ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांपैकी ३१ हजार ४६८ विद्यार्थी (९०.६८ टक्के ) उत्तीर्ण झाले. त्यात ८८.८९ टक्के मुले, तर ९२.७५ टक्के मुली आहेत. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एक लाख १७ हजार ५३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या एक लाख १७ हजार २३७ विद्यार्थ्यांपैकी एक लाख १३ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी देशभरातून १७ लाख चार हजार ३६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

Related Articles