हरयानात ३९ बांगलादेशी नागरिकांना अटक   

चंडीगढ : हरयानाच्या हांसी भागात पोलिसांनी ३९ बांगलादेशी नागरिकांना  अटक केली आहे. यामध्ये १४ पुरुष, ११ महिला आणि १४ मुलांचा समावेश आहे. तोशाम रस्त्यावरील एका वीटभट्टीवर कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय काम करत होती. 
 
हांसीचे पोलिस अधिक्षक अमित यशवर्धन म्हणाले, गुप्त माहितीच्या आधारे  वीटभट्टीवरील बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांची ओळख   आणि भारतात कसा प्रवेश केला याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.  हद्दपारी प्रक्रियेसाठी दिल्लीतील बांगलादेशी छावणीशी संपर्क साधण्यात आला आहे.
 
बांगलादेशी नागरिकांनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश केल्यामुळे सुरक्षा यंत्रणा  सतर्क झाल्या आहेत. बांगलादेशी नागरिकांना घुसखोरीसाठी मदत करणार्‍यांची माहिती घेण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. याआधी, १५ दिवसांपूर्वी महेंद्रगडमध्ये १४ बांगलादेशींनाही पकडण्यात आले होते. ते बनावट आधार कार्ड बनवून पश्चिम बंगालमध्ये राहत होते. यामध्ये तीन कुटुंबांचा समावेश होता.

Related Articles