भारताने ताकद दाखवली   

डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संरक्षण क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक)

पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांची हत्या करून  त्यांच्या बायकांच्या कपाळावरील कुंकू पुसणार्‍या नराधमांना ‘ऑपरेशन सिंदूर’ने खणखणीत उत्तर दिले. ही कारवाई भारताची वाढती ताकद आणि बदललेले विचार दाखवून देणारी आहे. 
 
भारत  आणि पाकिस्तानच नव्हे तर ७ मे या दिवसाची जग आवर्जून नोंद घेईल .पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या भ्याड हल्ल्याला याच दिवशी  तीव्र स्वरुपाचे प्रत्युत्तर दिले गेले. पाशवी वृत्तीला मिळालेली ही सणसणीत चपराक म्हणायला हवी. पहलगाममधील घटनेनंतर भारत या हल्ल्याचा बदला कधी घेणार, हा प्रश्न विचारला जात होता.  एकीकडे सर्वसामान्य जनता बहुचर्चित मॉकड्रिलच्या तयारीत असताना भारताने एअर स्ट्राईक केला. याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे भावस्पर्शी नाव दिले गेले. यापूर्वी आपण उरी हल्ला पाहिला आहे. मात्र त्या आणि ताज्या हल्ल्यामधील गुणात्मक फरक जाणून घेणे गरजेचे आहे.
 
पहिली बाब म्हणजे  उरीचा हल्ला व्याप्त काश्मीरपर्यंतचा होता. तेथील जैश-ए-महमद व  लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटनांचे अड्डे  या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकने उद्ध्वस्त केले. मात्र  यावेळी आपण व्याप्त काश्मीर मधीलच नव्हे, तर पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डेही लक्ष्य केले.  पंजाब प्रांतातील जैश-ए-महमदचा गड उद्ध्वस्त केला. येथूनच दहशतवादी कृत्यांसाठी तरुणांना भडकवण्याचे आणि तयार करण्याचे काम होत होते. अजहर मसूदने उभारलेले बहावलपूरमधील ठाणे आपण उद्ध्वस्त केले. तसेच सीमारेषेपासून वीस किलोमीटर आतमध्ये लष्कर-ए-तोयबाचा भागही उद्ध्वस्त केला आहे. म्हणजेच व्याप्त काश्मीरपुरते मर्यादित न राहता आता आपण पाकिस्तानमधील अंतर्गत ठिकाणांवरही हल्ला चढवला आहे. हल्ल्यातील हे वेगळेपण नोंद घेण्याजोगे आहे.
 
दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तानकडून बालाकोटाचा हल्ला झाल्याचे मान्य करण्यात आले नव्हते. मात्र यावेळी पाकिस्तानने अधिकृतपणे आपल्या देशातील नऊ ठिकाणांवर भारताने हल्ला केल्याचे कबूल केले आहे. यात किती जण मारले गेले, किती जखमी झाले याची आकडेवारीही सांगितली आहे. तिसरी बाब म्हणजे मागील हल्ल्यात आपली लढाऊ 
 
विमाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा  ओलांडून आत घुसली होती. मात्र यावेळी आपण ही सीमा पार केली नसून आपल्याच हद्दीमधून त्यांना उडवले आहे. यावरुनही आपल्या लढाऊ विमानांची, क्षेपणास्त्रांची, हल्ल्याची क्षमता सिद्ध होते.  ताजा हल्ला तीन्ही  सशस्त्र दलांनी  एकत्रितपणे  पार पाडला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  या हल्ल्यात आपण एकाही सामान्य नागरिकाला, पाकिस्तानमधील लष्करी केंद्रांना नुकसान पोहोचवलेले नाही. त्यामुळेच आपल्यावर कोणीही आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचा आरोप करु शकत नाही.भारत हा अत्यंत संयमी, जबाबदार देश आहे. अगदी इतिहास काळापासून पाहिले तरी आपण कधीच कोणावर प्रथम हल्ला केलेला नाही, हे दिसते. आताही आपण तसे करत नाही. त्यामुळेच भारताने केलेल्या ताज्या हल्ल्याचे स्वरुप आपल्याला धोका असणारी ठिकाणे आधीच उद्ध्वस्त करणे या स्वरुपाचा आहे.  
 
पाकिस्तानमधील या भागातील मदरशांमध्ये दहशतवाद्यांची भरती आणि प्रशिक्षण होत असल्याचे माहिती असल्यामुळे ही स्थाने नामशेष करण्याची आपली कृती समर्थनीय ठरते. तेथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी पुढे सीमा ओलांडून भारतात घुसतात आणि नरसंहार घडवून आणतात.  त्यांना संपवण्यामागे आपल्यापुढील धोका कमी करणे हाच स्पष्ट हेतू दिसतो.हे करताना आपल्याकडून कोणत्याही आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन वा भंग झालेला नाही, कारण हा हल्ला कोणत्याही देशावर नसून तेथे आश्रय घेणार्‍या दहशतवाद्यांवर आहे. असे असतानाही पाकिस्तानकडून  उत्तर देण्याची धमकी देण्यात आली. पाकिस्तानने आपल्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला तर अर्थातच त्यांना तो भारताच्या लष्करी तळांवर करावा लागेल. येथील सर्वसामान्य नागरिकांवर करावा लागेल. असे केले तर पाकिस्तानकडून युद्धाच्या हेतूने पाऊल टाकले गेल्याचे म्हणता येईल. हा निश्चितच आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग असेल आणि भारताला पूर्ण शक्तीनिशी त्याचा प्रतिकार करण्याचा अधिकार असेल. त्यामुळेच पाकिस्तानपुढील प्रश्न आता अधिक जटिल बनले आहेत, यात शंका नाही.हे लक्षात घेऊनच पाकिस्तानने आक्रस्ताळेपणा करण्यास सुरूवात केली आहे. 
 
भारताच्या हल्ल्यात आपले काही नागरिक, महिला, लहान मुले मारले गेल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तसा तो सातत्याने होत राहील. कारण भारतावर हल्ला करण्याचे कारण पुढे करायचे तर भारतात दहशतवाद्यांची प्रशिक्षणस्थळे नाहीत. भारत कधीही इतर देशांमध्ये दहशतवादी पाठवत नाही. त्यामुळे पाकिस्तान इथे नेमके काय उद्ध्वस्त करणार? हा प्रश्न आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपले सामान्य नागरिक मारले गेल्याचा कांगावा केला जाईल. पण त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा म्हणाला लागेल. त्याला यश वा जगाकडून समर्थन, सहानुभूती मिळणार नाही.या हल्ल्यामध्ये  दहशतवाद्यांचे अनेक  तळ उद्ध्वस्त केले गेल्यामुळे येथे सुरू असणारी प्रशिक्षणाची साखळी तुटली असून भारतात येणार्‍या दहशतवादी शक्ती कमी वा नाहीशा होतील. स्वाभाविकच हा हल्ला आपल्याला काही वर्षे पुढे नेणारा ठरेल. मदरशांमधून लहान मुले, तरुणांना ‘जिहाद’कडे आकर्षित केले जाते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे यातून जगातील अनेक दहशतवादी संघटनांना अतिरेकी पुरवण्याचे काम होते.  म्हणूनच त्यांच्या ठिकाणांवर हल्ला करुन आपण भविष्यात भारताला असणारे धोकेच नव्हे तर, जगाला असणारे दहशतवादाचे धोकेही कमी केले आहेत.अर्थात शत्रूला कधीही कमी समजायचे नसते. ताकद नसली तरी पाकिस्तान फणा काढणारच नाही, असे समजून चालणार नाही. आपले एक क्षेपणास्त्र त्यांचे नुकसान घडवू शकत असेल तर त्यांचे एक क्षेपणात्र आपलेही मोठे नुकसान करु शकते. त्यामुळे प्रति हल्ला रोखण्यासाठी भारत कोणती पावले उचलतो, कोणती सिद्धता करतो हे आता पहावे लागेल. 
 
माझ्या मते, कितीही वल्गना केल्या  तरी पाकिस्तान प्रत्युत्तर देईल, असे वाटत नाही, त्यांचा कोणताही हल्ला रोखण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा आहे. त्यांची क्षेपणास्त्रे रोखणारी अर्ली वॉर्निंग सिस्टीम आपल्याकडे आहे. त्याचप्रमाणे एस ४०० ही अँटी मिसाईल सिस्टीम आहे, जी अशा प्रकारच्या मिसाईल तसेच लढाऊ विमानांना पूर्णपणे निष्प्रभ करु शकते. मुळात आपण सामान्य नागरिकांना लक्ष्य केले वा  भारतीय लष्करावर हल्ला करत क्षेपणास्त्र डागले तर भारताकडून खात्रीने प्रत्युत्तर मिळेल, हे ते जाणतात. तेव्हा कोणीही भारताला थांबवू शकणार नाही, कारण आता संघर्षाचे स्वरुप दहशतवाद विरुद्ध भारत असे आहे. मात्र पाकिस्तानकडून भारतातील नागरी वस्त्यांवर हल्ले झाले तर संघर्षाचे स्वरुपही बदलेल. ते युद्धाचे पहिले पाऊल समजले जाईल. तेव्हा पाकिस्तान याचा नक्कीच विचार करेल.
(शब्दांकन: स्वाती पेशवे)

Related Articles