पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न उधळला   

लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तानने बुधवारी रात्री उशिरा उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा हा प्रयत्न भारताने उधळून लावला. तसेच, लाहोरमधील पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली भारताने उद्ध्वस्त केली. 
 
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री, कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली. व्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ भारताने उद्ध्वस्त केले. यामध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए महमदच्या मुख्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे पाकिस्तान अधिकच बिथरला आहे. पाकिस्तानने भारतातील १५ लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न उधळून लावला, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
 
पाकिस्तानी सैन्याने परवा रात्री अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंडीगढ, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भूज ही ठिकाणे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. भारताने हा हल्ला परतवून लावला, असेही ते म्हणाले.  भारताच्या रशियन बनावटीच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली आणि इंटिग्रेटेड काउंटर अ‍ॅण्ड ग्रिडने पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र निष्क्रिय केले. या ड्रोनचे आणि क्षेपणास्त्राचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत. ते पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट झाले असून, लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आली आहे. 

पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र : मिस्री

पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र बनला आहे. त्याचे ढिगभर पुरावे आम्ही दिले. पण, पाकिस्तान नेहमीच जबाबदारी नाकारत आला आहे. पहलगामधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केला. आम्ही, त्यास प्रत्युत्तर दिले. सीमेवरील तणाव कमी करायचा की नाही, हे पाकिस्तानने ठरवावे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले.
 

Related Articles