पुर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या १६ जणांसह नाव बुडाली   

स्थानिकांच्या मदतीने सर्वांना वाचविण्यात यश

रत्नागिरी : रत्नागिरी जवळच पुर्णगड येथील समुद्रात बुडणा-या १६ तरुणांना स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी वाचविले. पुर्णगड समुद्रात फिरायला गेलेल्या १६ तरूणांच्या सरस्वती नावाच्या बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने ती पाण्यात बुडाली. 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील पावस आणि रनपार गावातील १६ तरुण मौज करण्यासाठी मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी फिनोलेक्स केमिकल जेटी येथून सरस्वती नावाच्या बोटीतून समुद्रात फिरण्यासाठी गेले होते. समुद्र खवळलेला असल्याने बोटीत तांत्रिक बिघाड झाला. यामुळे नाव पलटली. सर्व तरुण पाण्यात पडले. मात्र जवळच असलेल्या अल फरदिन बोटीवरील तांडेल फरीद ताजुद्दीन तांडेल यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ मदतीला धावले. 
 
त्याचवेळी, रत्नागिरी पोलीस दलाचे सागर कवच अभियान अंतर्गत बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या 'सिल्वर सन पायलट' बोटीवरील पोलीस कर्मचारी मुजावर, विजय वाघब्रे, आणि अपूर्व जाधव यांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले.
 
या सर्वांच्या प्रयत्नांमुळे सर्व १६ तरुणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाले. वाचलेले सर्व १६ तरुणांना पूर्णगड पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रथमोपचार देऊन पालक आणि नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुर्दैवाने, या अपघतात सरस्वती बोट ही पूर्णपणे पाण्यात बुडाली. या घटनेचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे करत आहे.
 

Related Articles