ग्रामविकासाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने योगदान द्यावे : ग्रामविकास मंत्री गोरे   

पुणे : ग्रामविकास विभाग प्रगतीपथावर घेऊन जाण्यामध्ये जिल्हा परिषद हा महत्त्वाचा घटक असून, ग्रामविकासाला अधिक चालना देण्यासाठी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
 
ग्रामविकास विभागाच्या वतीने ’यशदा‘ येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला शनिवारी सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
 
मंत्री गोरे म्हणाले, विचारांची देवाण-घेवाण करून चर्चेतून वेगळे प्रशासन प्रगतीपथावर गेले पाहिजे. ही शासनाची भूमिका आहे. शासनाची योजना, निर्णय, धोरणे ग्रामस्तरांवर पोहोचविण्याची जिल्हा परिषदेचे मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणांनी सकारत्मक भूमिका ठेऊन काम करावे व यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करावा, त्यासाठी आवश्यक असल्यास कामकाज व्यवस्थेत बदल करावा. शासन निर्णयांची अंमलबजावणी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
 
ग्रामविकास विभागामार्फत सर्वांसाठी घरे योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत २० लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित १० लाख घरांना लवकरच मान्यता मिळेल. ही घरकूल योजना परिणामकारक नागरिकांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करावे. घरकुलांचा जागेसाठी गायरान-गावठाण येथे जागा उपलब्ध करून देण्याच्या कामाला विभागीय आयुक्तांना प्राधान्य द्यावे, राज्यात गतीने व परिणामकारक कामाच्या दृष्टीने १०० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे. त्यात ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. प्रत्येक जिल्ह्याने नवीन संकल्पना राबवाव्यात, बचत गटाच्या महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ’वूमन मॉल‘ बनविण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले.
 
राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, नवीन संकल्पनांची देवाण-घेवाण व्हावी यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व अधिकार्‍यांनी ग्रामविकासासाठी संवेदनशीलतेने काम करावे. क्षेत्रीय स्तरांवर पोहोचवून योजनांना गती द्यावी. जिल्हा परिषदेने विविध कल्पना राबवाव्यात यासाठी शासन पाठीशी राहिल. विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ असून, समांतर पातळीवर विचारांची देवाण-घेवाण होणे हा कार्यशाळा आयोजना मागचा उद्देश असल्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.  सुरुवातीला पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Articles