E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
ढासळते पर्यावरण रोखणे हे पुण्यापुढे मोठे आव्हान !
Samruddhi Dhayagude
12 Jun 2025
समस्याग्रस्त : पुणे : सुरेश कोडितकर
पर्यावरणासोबत आपले सह आस्तित्व हे नव्या रक्ताच्या लोकांना माहीतच नाही जणू. त्यामुळे निसर्गाची लूट, पर्यावरणाची हानी, वातावरणावर आघात हे सारे वाढत्या श्रेणीने सुरु आहे. पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील असा पश्चिम टापूसुद्धा धोक्याच्या वळणावर उभा आहे. वनांचा विनाश, खाणींचे खोदकाम, डोंगरांची मोडतोड, शेतीचा र्हास, जमिनींची धूप, उत्पादकतेत घट, वन्यप्राणी पक्षी प्रजाती वनस्पती या नामशेष होण्यात वाढ, जलस्रोतांचे प्रदूषण आणि भूजलाची हानी हे सारे घडत आहे. आपण उघडया डोळ्यांनी हे पाहतोय. जनमताचा दबाव कमी पडतोय. पर्यावरण ही वसुंधरेची सर्वव्यापी श्रुंखला आणि आच्छादन आहे. त्यामुळे नुकसान आणि संवर्धन याचे भलेबुरे परिणाम सर्वांनाच प्राप्त होणार आहेत. पृथ्वी, खंड, देश, राज्य, जिल्हा ते आपले शहर असा पहिला विचार आणि संदर्भ आणि संपर्क असा दुवा स्थापित करणे हा दुसरा विचार करून पर्यावरण जोपासले तर ही धरा हरित, सुजलाम, सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. पण पर्यावरणासोबत आपले सहआस्तित्व आहे, हा विचार लोप पावला आहे. उरली आहे फक्त निसर्ग ओरबाडण्याची, त्याला पाहण्यापेक्षा शूट करून समाजमाध्यामांवर अपलोड करण्याची हिडीस स्पर्धा.
पुण्याच्या पर्यावरणाचे जे हाल गेल्या ३ ते ४ दशकात झाले आहे ते आपण सर्वांनी पाहिले. आज पुण्यातील अतिक्रमणयुक्त वन क्षेत्र, महापालिका हद्दीतील रोडावलेली वृक्ष संपदा, आक्रसलेले ओढे आणि नाले, लुप्त नदी, टेकडयांचे लचके तोडगिरी, दुर्गंधीयुक्त नदी, प्रदूषणग्रस्त हवा, विहिरी आणि झरे नामशेष होणे, पुणे परिघावरील आणि हवेली तालुक्यातील घटते कृषी क्षेत्र हे सर्व आपल्या अनास्थेचे पुरावे आहेत. जे शहर केकाळी सुखद हवामान आणि रमणीय परिसर, प्रसन्न आणि आल्हाददायक हवा यासाठी सुपरिचित होते, त्या शहराच्या समग्र नैसर्गिक सौंदर्याला असे शापग्रस्त व्हावे लागावे, हे वेदनादायी आहे. विकास हवा आहे. सुधारणांना कोणाची हरकत नाही. पण त्यासाठी आपण कशाचा बळी देतो याचे भान कोणाला उरलेले नाही. जबाबदार लोकांची बेफिकिरी, अपुरी विचारसरणी, दूरदर्शीपणाचा अभाव यामुळे पुण्याचे आरोग्य निरंतर ढासळत गेले आहे.पर्यावरण जगवणे आणि संवर्धन करणे यासाठी आधी विचारांची सुस्पष्ट बैठक, पिढयांचा विचार आवश्यक असतो. दुर्दैवाने व्यापक समाजहित हे दुय्यम ठरल्याने पुण्याच्या पर्यावरणाची वासलात लागली आहे. संपूर्ण पुण्याच्या पर्यावरणाच्या एकेका घटकाचा गळा घोटला गेला आहे. आज टेकडयांवर झोपडपट्टी आहे. नदीपात्रात गटार आणि गाळ आहे. नैसर्गिक तलाव आणि इतर जलस्त्रोत आक्रसताहेत आणि दुषित होत आहेत. हवा वाहनांचा धूर, धूळ, जाळलेल्या केरकचरा याचा वास सामावून कडवट झाली आहे. बाकी झाडांची कत्तल, पशु पक्ष्यांचा नाहीसा होणारा अधिवास, ध्वनी प्रदूषण, गर्दी/गोंगाट, याबद्दल न बोललेले बरे. ही धोक्याची घंटा आहे.
निसर्ग मूक आहे, पण निसर्ग ज्याचे माप त्याच्या पदरात टाकणारा आहे. आपण निसर्गात ढवळाढवळ करतोय. नैसर्गिक संतुलनाला बाधा पोहचवतोय. परिणामी ढगफुटी, अवकाळी पाऊस, पूर, उष्णतम उन्हाळा, थंडीचा अल्प कालावधी हे सगळे आपण पाहतोय, अनुभवतोय. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन केलेली कामे हा त्याची कारणे आहेत हे मात्र आपल्याला उमगत नाही किंवा आपण त्याकडे आपण आपल्या जीवनशैली हव्यासापायी दुर्लक्ष करतोय. झाडेझुडपे, बागा, विहिरी, तुरळक वाहने, नदीतील बेट, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि लगबग, नदीपात्रातील नौकानयन आणि गळ टाकून केली जाणारी मासेमारी, टेकडयांवरील वनराई आणि गावांमधील देवराई,देवस्थानांच्या परिसरातील झरे वा कुंड आणि तलाव हे सृष्टीवैभव होते कोणे काळी. काळाच्या ओघात हे नष्ट झाले आहे. उरला आहे काँक्रिटच्या जंगलात आणि काचेच्या गर्दीत गुदमरलेला पुण्याचा आत्मा. जो तडफडतोय आपल्या हरित, शीतल, प्रसन्न, सुखासीन क्षणांसाठी. पण ते आता फिरून माघारी येणार नाहीत. काळाची पावले उलटी फिरवता येणार नसली तरी पर्यावरण जपणे हे मात्र सर्व वयोगटातील लोक करून शकतात. नव्हे पर्यावरण जपणे, वाढवणे याला तरणोपाय नाही, अन्यथा परिणाम भोगणे भाग आहे.
मुळामुठा नमामि कधी ?
पुण्याची लोकमाता म्हणजे आपली मुळामुठा नदी. नमामि मुळा मुठा हे अभियान राबवून मुळा मुठेचे पुनरुज्जीवन करता येईल का ? आपण मोठमोठी कर्जे घेऊन नदी काठावर सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे उभारत आहोत. पण त्याच्या सुयोग्य देखभाल दुरुस्ती आणि कार्यान्वयनाचे काय ? नदीपात्रात केरकचरा, उष्टेखरकटे, निर्माल्य, राडारोडा टाकला जात आहे. नदीपात्रात अतिक्रमणे झाली आहेत. नदीपात्रात निळी आणि लाल रेषा कधी निश्चित होणार ? नदीपात्र रुंदी निर्धारित आणि दोन्ही काठ हे कायमस्वरूपी अंतिम कधी केले जाणार ? पुण्यात जमिनी शिल्लक नाही. रस्ते, पदपथ यासाठी एक इंच जागा शिल्लक नाही. त्यामुळे आता मोहरा नदीपात्रातील शिल्लक जागांकडे वळवण्यात आला आहे. बागबगीचा, रस्ता, विश्रांती स्थाने तिथे प्रस्तावित आहेत. पण दुर्गंधीयुक्त मुळा मुठा नदीपात्रातील बागेत आणि विरंगुळा केंद्रात कोणीही जाणार नाही, हे कोणाच्या का लक्षात येत नाही ? नदीपात्रात उतरून जाण्यासाठी मार्ग नाही. वाहने लावायला जागा नाही. आपापल्या परिसरातील बागबगीचा सोडून मार्गावरील नदीपात्रातील बागेत कोण कशाला जाणार ? शेवटी ही स्थाने गर्दुल्ले आणि जुगारी, गुंड यांची आश्रयस्थाने होणार हे नक्की. पर्यावरण राखणे, जोपासणे हे मुलभूत काम करण्याचा विचार नसेल तर नदी विकासाची कामे अशी दिशाहीन होतात. अशुध्द पाण्यातील जैविक पदार्थांचे विघटन करण्यासाठी सूक्ष्म जंतूंना ऑक्सिजनची किती गरज भासते हे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड यावरून ठरते. हे प्रमाण ३० मिलिग्रॅम प्रति लिटर पेक्षा कमी असावे असे अपेक्षित असते. मुठा नदी या निकषावर नापास ठरते. कारण मुठा नदीपात्रातील पाण्याचे विठ्ठलवाडी, म्हात्रे पूल, एरंडवणे, जोशी पूल, रेल्वे पूल येथे घेतलेले नमुने हे ३० मिलिग्रॅम प्रति लिटर ही मर्यादा ओलांडतात. मुळेची परिस्थिती यापेक्षा वेगळी नसावी.
वनराई, देवराई हव्यात !
पुणे शहरात सध्या ५५ लाख झाडे आहेत असा महापालिकेचा वृक्ष गणना अहवाल सांगतो. पण या झाडांच्या सक्षमतेबद्दल काय ? त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र कोण देणार ? या झाडांच्या सुरक्षिततेची आणि संवर्धनाची जबाबदारी कोणाची ? महापालिकेने वृक्ष संपदा वाढावी म्हणून काय केले आहे ? पुण्यात बाग बगिच्यांची संख्या निश्चित वाढती आहे. पण त्याने फक्त जागा अडवणे आणि व्यायामाची अवजारे आणि लहान मुलांसाठी खेळणी यावर खर्च करणे हे घडत आहे. स्वतंत्र वृक्षराजी, अथवा झाडांची दाटी यासाठी महापालिकेने काही केल्याचे ऐकिवात नाही. भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या सहकार्याने एम्प्रेस गार्डन सारखे काही करता आले असते. दुर्मिळ वृक्ष लागवड जतन आणि संवर्धन करता आले असते. पण ती दृष्टी आणि विचार नसल्याने बागा आणि खर्च हेच पाहिले गेले. बेसुमार नागरीकरण झाडांच्या अस्तित्वावर घाला घालत आहे. झाडे ही आपली श्वास आणि संपत्ती आहे हा विचार नाहीसा झाल्याने कृत्रिम बागा आणि कुंड्यातील रोपे यांनाच महत्व आले आहे. जैववैविध्य उद्यानासाठी जागा आरक्षित केल्या जात आहेत. असे उद्यान उभारणे आणि संवर्धन करणे हे आव्हानात्मक काम आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे हे पायावर कुर्हाड मारून घेणे आहे. परिसंस्था या एका दिवसात उभ्या राहत नाही. जैविक साखळी ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. तिच्या निर्मितीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागते. ते जोपासावे लागते. त्यात सर्व पूरक आणि पोषक घटकांचे संम्मिलन साधावे लागते. दुर्दैवाने याबाबत जाणकार लोकांचा अभाव यामुळे या सर्व कामांमध्ये निरुत्साह, नकारात्मकता दिसून येत आहे. जैव विविधता उद्यान, वनीकरण, वनराई, देवराई हे सारे जमीन आणि माती घट्ट धरून ठेवणारे घटक आहेत. पुण्यात एकतर सर्वत्र काँक्रीटचे प्रस्थ माजल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण रोडावले आहे आणि वृक्ष संख्या घटल्यामुळे जमिनीची निरंतर धूप होऊन सारी माती, वाळू, चाळ वाहत नदीकडे झेपावतो आहे आणि तळाला साचून नदीच्या वहन क्षमतेवर परिणाम करतो आहे.
नागरीकरण पर्यावरणाच्या मूळावर
आज पुण्यात सर्वत्र नवीन बांधकामांचे आणि पुनर्विकासाचे पेव फुटले आहे. प्रत्येकाला उंच इमारतीत राहायला जायची ओढ लागली आहे. त्याबद्दल नाक मुरडायचे काम नाही. पण आपले आस्तित्व आणि सहआस्तित्व ज्यामुळे निसर्गामुळे आहे त्या धरा माय माउलीला आपण जपणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. वटपौर्णिमा उत्साहात झाली. जागतिक जल दिन, जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करतो. तथापि या कागदी आणि कर्मकांड औपचारीकतेपलीकडे काय ? त्यासाठी मात्र कोणी कंबर कसून पुढे आल्याचे दिसून येत नाही. पुणे शहरात पर्यावरण सुरक्षा, जोपासना यासाठी काम होणे अगत्याचे आहेच पण शहराच्या हद्दी बाहेरील पडीक जमीन लागवड कार्यक्रम, गायरान, चोपण जमीन विकास कार्यक्रम याबद्दलही शासनाने विचार करायला हवा. शहराच्या आजूबाजूला पर्यावरण संवर्धन झाले तर ते अंतिमतः शहराला लाभदायक ठरणार आहे. शेती ना विकास मधून निवासी विभागात आणून भूखंड विक्रीचे खूळ माजले आहे. शेती करायची पुढच्या पिढीची इच्छा नाही आणि वाडवडिलांनी राखलेल्या जमिनी विकून एका रात्रीत श्रीमंत होण्याची आजच्या पिढीची इच्छा शिवार मळा उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने अग्रेसर आहे. काय ?
पर्वती, वेताळ, हनुमान, दिघी, तारकेश्वर, बावधन, या टेकड्या फोडून काय साध्य होणार ? आणखी काही डोंगर पोखरून भुयारी शॉर्टकट केला जात आहे. जनतेच्या सोयीसाठी काही केले जात असेल तर ते व्हायला हवे. आणि त्यात पर्यावरणाची किमान हानी होईल याची काळजी घ्यायला हवी. दुर्दैवाने जनतेच्या सोयीचे म्हणून जे जे काही केले जात आहे त्यातून सोय साध्य होत नाही आणि पर्यावरणाची अपरिमित हानी होते. माती, दगड, खडक, मुरूम यांना शासन गौण खनिज म्हणत असले तरी त्यांचे आस्तित्व हरित क्षेत्र निर्मिती आणि संवर्धन यासाठी आवश्यक आहे. पंच महाभूते यावर आपले शरीर आणि जीवसृष्टी अवलंबून आहे. त्यांच्या सहभाग आणि सहआस्तित्व याव्दारे मानव समाजाची उन्नती शक्य आहे. जलस्त्रोत, टेकडी, नदीनाले, वृक्ष, जीवजंतू, पशुपक्षी, जलजीव, गर्द हिरवळ हे सारे आपण जगण्यातून आणि भोवतालमधून वगळू शकत नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षीही सुस्वरे आळविती हे आपले धोरण असताना त्यापासून ढळणे अयोग्य आहे.
Related
Articles
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
युट्यूबर कांचन कुमारी यांची पंजाबमध्ये हत्या
17 Jun 2025
फडणवीस-राज ठाकरे यांच्यात बैठक
13 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !