उजनीत १४ दिवसांत १२ टीएमसी पाणी   

सोलापूर, (प्रतिनिधी) : उजनी धरणाच्या इतिहासात यंदा प्रथमच धरण मे महिन्यातच जिवंत साठ्यात आले आहे. मागील गेल्या चौदा दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी धरणात जमा झाले आहे. गेल्या वर्षीही धरण ११० टक्के भरल्यानंतर जिवंत पाणीसाठा संपून वजा २३ टक्केपर्यंत धरणाची पातळी खालावली होती. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने यंदा प्रथमच मे महिन्यात उजनी धरणाने मृत साठ्याची पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे. उजनी धरणात सध्या २६ हजार क्युसेक वेगाने पाणी जमा होत असून, असाच पाऊस सुरू राहिला तर पुढच्या काही दिवसात पुराचे संकट उभे राहणार आहे.
 
उजनी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. या धरणाची पाणी क्षमता ही ११७ टीएमसी आहे. मागील वर्षी देखील चांगला पाऊस झाला होता. त्याामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या धरण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर बागायती शेती अवलंबून आहे. विशेषतः ऊस शेती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यााचबरोबर केळी, डाळिंब, द्राक्षांच्या बागांचे क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्याामुळे उजनी धरणात होणारी पाण्याची वाढ ही शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणारी ठरत आहे.पुणे, सोलापूर आणि नगरकरांसाठी जीवनदायनी ठरलेले उजनी धरण आता मायनस मधून प्लसमध्ये आले आहे. 
 
पुणे जिल्ह्याच्या घाटामध्यावर आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून पाऊस कोसळत आहे. सध्या दौंड बंधार्‍यातून उजनी धरणात २६ हजार १०६ क्युसेकने वेगाने पाणी येत असल्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. उजनी धरणी एकूण पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी इतकी असून जेव्हा धरण ११७ टीएमसी इतके भरले जाते तेव्हा ते १०० टक्के क्षमतेने भरते. आता उजनीत ६३ टीएमसी हून अधिक पाणी साठा आहे. जर पावसाचा वेग असाच राहिल्यास अगदी मोजक्या दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जुलैपूर्वीच जिल्ह्यावर पूर परिस्थितीची टांगती तलवार?

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुळधार पावसामुळे केवळ १४ दिवसांत उजनीने वजा २३ टक्क्यांपासून शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे. यंदा १३ मे पासून उजनी धरणात हळूहळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या १४ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी धरणात जमा झाले. मंगळवारी सकाळी आठ वाजता उजनी धरणाने जिवंत साठ्यात केला प्रवेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी या दिवशी उजनी धरण हे वजा ५९ टक्के एवढ्या नीचांकी पातळीला होते. मात्र, यावर्षी याच दिवशी धरणात मृत साठा भरून जिवंत साठ्यात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अजून मान्सून या भागात पोहोचायचा असून असाच पाऊस सुरू राहिला तर यंदा जुलैच्या पूर्वीच सोलापूर जिल्ह्यावर पूर परिस्थितीची टांगती तलवार असू शकते, असेही जाणकारांचे मत आहे.
 

Related Articles