मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा   

भाजपची मागणी

बंगळुरु :  बंगळुरुतील चेंगराचेंगरीस भाजपने कर्नाटकातील सरकारला जबाबदार धरले आहे. ही ‘सरकारनिर्मित’ चेंगराचेंगरी असल्याचा आरोप करतानाच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे.बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बुधवारी चेंगराचेंगरीत ११ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ५० हून अधिक जखमी झाले. आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयोत्सवासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
 
भाजप खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातील भांडण आणि मतभेदामुळे राज्यात सरकारनिर्मित चेंगराचेंगरी झाली, असा आरोप केला.या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील केली.यावेळी त्यांनी तेलंगणातील चेंगराचेंगरीची आठवण करुन दिली. काही दिवसांपूर्वी तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन याला अशाच एका चेंगराचेंगरी प्रकणात तत्काळ अटक करण्यात आली होती. मग, शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कार्रवाई का होऊ नये? असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही पात्रा यांनी टीकास्त्र सोडले. या घटनेवर राहुल गांधी यांनी मौन सोडावे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील मतभेदामुळे नाहक ११ जणांना प्राण गमवावे लागले, असा आरोपदेखील त्यांनी केला. याआधीदेखील, अशा प्रकारे विजयोत्सव साजरे झाले आहेत. मात्र, ते नियोजनबद्ध असत. कालच्या घटनेतून नियोजनाचा अभाव स्पष्ट होतो, असेही ते म्हणाले. विजयोत्सवाची इतकी घाई का केली? असा सवालही त्यांनी केला. आयोजक आणि पोलिसांमध्ये कोणताही समन्वय नव्हता, असेही त्यांनी सांगितले.
 
स्टेडियमबाहेर लोक मृत्युमुखी पडत होते आणि आतमध्ये कार्यक्रम सुरु होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कराची खिल्ली उडवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आता कुठे आहेत? ते मौन का आहेत? असा सवालही त्यांनी केला. 

आरसीबीकडून दहा लाखांची आर्थिक मदत

आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या ११ समर्थकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. विराट कोहली आणि अन्य खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी चेंगराचेंगरीत ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. तर, ५० हून अधिक जखमी झाले होते. या दुर्देवी घटनेमुळे मोठे दुःख आणि वेदना झाल्या आहेत, असे निवेदन आरसीबीने समाज माध्यमावर दिले. तसेच, आरसीबीने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत देखील जाहीर केली. 

बहुतांश जखमी घरी परतले

बंगळुरु चेंगराचेंगरी

बंगळुरु : बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत जखमी झालेले बहुतेक रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. काही रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी सांगितले.बंगळुरुतील बोरिंग आणि लेडी कर्झन रुग्णालयात दाखल १० रुग्णांपैकी फक्त दोघांवरच उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. चेंगराचेंगरीनंतर अठरा जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे वैद्यकीय अधीक्षक टी. केम्पाराजू यांनी सांगितले. 
 
केम्पाराजू पुढे म्हणाले की, जखमींपैकी किरकोळ जखमा झाल्या होत्या. तर, काहींना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. एकाच्या पायास गंभीर दुखापत झाली आहे. गर्दीत खाली पडल्याने त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. एका १४ वर्षांच्या मुलास किरकोळ दुखापत झाली आहे. पण, उजव्या डोळ्याजवळ जखम झाली आहे. त्यामुळे त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याला उद्यापर्यंत घरी सोडले जाईल, असेही ते म्हणाले.

शिवकुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा

केंद्रीय मंत्र्यांची मागणी

चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी गुरुवारी केली. या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली. राज्यातील काँग्रेस सरकारने घाईघाईने कार्यक्रमाचे आयोजन केले. हे दुर्घटनेवरुन स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.
 

Related Articles