हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ   

वृत्तवेध 

हायब्रीड वाहनांनी भारतात इलेक्ट्रिक वाहनांशी स्पर्धा करण्याऐवजी विक्री वाढवण्यात योगदान दिले आहे. ‘एचएसबीसी ग्लोबल रिसर्च’ने एका अहवालामध्ये हे म्हटले आहे. हायब्रीड वाहने पारंपारिक पेट्रोल किंवा डिझेल तसेच विजेवर चालतात. या दोन्ही तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर वाहनाची इंधन कार्यक्षमता सुधारतो आणि उत्सर्जन कमी करतो.
 
अहवालात म्हटले आहे की, भारतीय ऑटोमोटिव्ह क्षेत्र मध्यम ते दीर्घ कालावधीत अनेक इंधन पर्यायांसह एक महत्वाचा उद्योग ठरेल. यापैकी हायब्रीड, सीएनजी आणि जैवइंधन हे मध्यम ते दीर्घकालीन व्यवहार्य उपाय आहेत. देश इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याकडे वाटचाल करत आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहने (एसएचईव्ही) आणि बॅटरी इलेक्ट्रिक वाहने (बीईव्ही) एकमेकांना मारक नाहीत, तर वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करतात, असे निरिक्षण ‘एचएसबीसी ग्लोबल रिसर्च’ने नोंदवले आहे.
 
‘हायब्रीड’ वाहनांचा ‘ईव्हीं’ना फायदा
 
या अहवालानुसार, हायब्रीड वाहनांना सरकारी प्रोत्साहन देणार्‍या राज्यांमध्ये ‘बॅटरी ईव्ही’च्या विक्रीमध्येही मोठी वाढ दिसून आली आहे. भारतातील सर्वात जास्त प्रवासी वाहन विक्री असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असूनही २०२४-२५ मध्ये बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढ हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीइतकीच होती. या ट्रेंडवरून दिसून येते की ‘एसएचईव्ही’ स्वीकारल्याने ‘बीईव्ही’ विक्रीवर सकारात्मक परिणाम होत आहे. ‘एसएचईव्ही’चा प्रचार केल्याने ‘बीईव्ही’ स्वीकारण्यास अडथळा येईल, ही धारणा चुकीची आहे. एकूण प्रवासी वाहनांमध्ये हायब्रीड वाहनांचा वाटा २०२३-२४ मधील २.१ टक्क्यांवरून २०२४-२५ मध्ये २.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Related Articles