१२ फुटांचे शेत रस्ते अनिवार्य; सातबारावरही नोंद   

मुंबई, (प्रतिनिधी) : शेतीच्या बांधावरील पारंपरिक अरुंद शेतरस्ते आता ३ ते ४ मीटर म्हणजे जवळपास १२ फूट रुंद करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. महाराष्ट्राचा आधुनिक शेतीकडे वाढता कल, मोठ्या कृषी अवजारांची वाहतूक तसेच शेतीमाल योग्य वेळेत बाजारपेठेत पोहचावा, यासाठी हा निर्णय शेतीसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शेतकर्‍यांनी सध्या असलेले पारंपरिक शेत रस्ते बदलत्या काळात अडचणीचे ठरत असल्याच्या सूचना केल्या. ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर यांसारखी मोठी कृषी अवजारांची शेतात वाहतूक करताना बांधावर शेतकर्‍यांमध्ये काही ठिकाणी वाद झाल्याचे दिसून आले. शिवाय, शेतमाल बाजारपेठेत नेताना अरुंद रस्त्यांनी समस्या निर्माण होत असल्याच्या सर्व बाबींचा विचार करून १२ फुटांचा शेतरस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतरस्त्यांच्या जागांमध्ये अतिक्रमणासह भविष्यातील खरेदी विक्रीच्यावेळी अन्य शेतीविषयक वाद उद्भवू नयेत म्हणून या शेतरस्त्याची नोंद जमिनीच्या ७/१२मध्ये करण्यात येणार आहे.
 
शेतकर्‍यांना आधुनिक शेती आणि  उत्पन्नवाढीसाठी या निर्णयाचा नक्की लाभ होईल. प्रथम शेत रस्त्याची आवश्यकता तपासावी, शेजारच्या भूधारकाच्या वहिवाटीच्या हक्कांचा, त्यांच्या अडचणी, अपेक्षांचा विचार करावा. रस्त्याची रुंदी वाढवण्यासाठी यांत्रिकीकरणानुसार निर्णय घ्यावा.  अनावश्यक रुंदीकरण करू नये, अशा सूचना महसूल अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

Related Articles