मुंडेेंना ‘क्लीनचिट’ मिळाल्यास जागा मोकळी करेन : भुजबळ   

मुंबई, (प्रतिनिधी) : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे छगन भुजबळ यांना संधी मिळाली. मुंडे यांना क्लीनचीट मिळाली तर भुजबळ यांचे काय ? असा प्रश्न सतत उपस्थित केला जात आहे. याबाबत बोलताना, धनंजय मुंडे सर्व आरोपांतून मुक्त झाले आणि त्यांना क्लीन चिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे  स्वतः छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. सरकार स्थापन होताना मंत्रिपद मिळाले नाही तेव्हा मी दुखावले होतो. अनेक विचार येत होते. अजित पवार यांच्यासोबत अबोला झाला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. पण, या मंत्रिमंडळात भुजबळ यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे भुजबळ नाराज होते. पण, पाच महिन्यानंतर भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दबाव वाढल्याने मुंडे यांना मंत्रिपदाच्या राजीनामा द्यावा लागला व त्या मंत्रिपदावर भुजबळ यांना संधी मिळाली. मात्र, भविष्यात मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर भुजबळ काय करणार? असा प्रश्न त्यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा भुजबळ यांनी, मुंडे यांना क्लीनचिट मिळाली तर आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. मुंडे यांना मंत्रिमंडळात घ्यायचे ठरले, तर माझी काही हरकत नाही. मी या मंत्रिमंडळात पुन्हा आलो, सन्मानाने मला परत बोलावले. मुंडे सर्व आरोपातून मुक्त झाले, तर मी राजीनामा देईन, असे सांगितले. मंत्रिपद देताना या गोष्टीवर चर्चा झाली होती का?  या प्रश्नावर बोलताना, अशी चर्चा होऊ अगर न होवो, राजीनाम्याचा निर्णय मीच घेणार, असे स्पष्ट केले.
 
सरकार स्थापन झाले तेव्हा मंत्रिपद मिळाले नाही, याची खंत वाटत होती. मनात अनेक विचार येत होते. मी आणि अजित पवार बोलत नव्हतो. अजित पवार यांच्या घरच्या कार्यक्रमाला गेलो नाही. पण, मी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात मी उपस्थित राहिलो. मी ओबीसींसाठी लढल्यामुळेच लाडक्या बहिणींच्या सोबत ओबीसींची मते महायुतीला मिळाली, असा दावाही भुजबळ यांनी केला.
 
खरी राष्ट्रवादी कोणाची?
 
आजच्या स्थितीत खरी राष्ट्रवादी कोणाची? अजित पवार यांची की शरद पवार यांची? या थेट प्रश्नाला उत्तर देण्याचे भुजबळ यांनी टाळले. शरद पवार या वयात देखील आणि शारीरिक व्याधी असतानाही ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. अजित पवार सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात, मी त्यांचे सांगणार नाही. 
 
तेव्हाच सरकारमध्ये जाणार होतो
 
शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा सुप्रिया सुळेे यांना पक्षाचे अध्यक्ष करायचे आणि भाजपसोबत सरकारमध्ये जायचे ठरले होते. यामध्ये शरद पवार कुठेच असणार नाहीत, असेही ठरले होते. युतीची सर्व चर्चा करायला जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल पटेल जात होते. भाजपबरोबर जावे, यासाठी आमच्या अनेक बैठका झाल्या. त्यामध्ये अनिल देशमुखही होते. त्यापूर्वी २०१४ मध्येही असा प्रयत्न झाला होता. दिल्लीतून सांगण्यात आले की तुम्ही (राष्ट्रवादी) काँग्रेसची साथ सोडा आणि आम्ही शिवसेनेला सोडतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो होतो. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी होणार होती. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला  होता. परंतु, शरद पवार यांनी अलिबागमधील बैठकीत आपण भाजपला कायमचा पाठिंबा देणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस देखील घाबरले.  त्यांनी पुन्हा शिवसेनेला सोबत घेतल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Related Articles