भय इथले संपलेच नाही   

समृद्धी धायगुडे 

सध्या आजूबाजूला होणाऱ्या घटनांमुळे मन इतके सुन्न होते, कोणत्या प्रकारे या समाजातील छुप्या नराधमांना समज द्यावी हेच समजत नाही. तनिषा भिसे मृत्यू नंतर आता वैष्णवी प्रकरण याशिवाय इतर रोज समोर येणारी अतिप्रसंगांची प्रकारणे निराळीच. यात कमी म्हणून नुकतेच कर्नाटकात सामूहिक अतिप्रसंग करणारे आरोपी कारागृहातून बाहेर आल्यावर आलिशान गाडीतून माज दाखवण्याची पद्धत बघता प्रचंड संताप येतो. तनिषा भिसे प्रकरणात दुसऱ्याच दिवशी सासूने चक्क पाठ फिरवली. मलाच वाचून धक्का बसला. हे सर्व बघून अजूनही स्त्रीच्या जन्मापूर्वी पासून असलेले भय, संघर्ष अजूनही संपलेलाच नाहीये असे वाटते. 
 
उत्तर-दक्षिण भारतापेक्षा आपल्या राज्यात स्त्रियांची बरी परिस्थिती आहे असे वाटत होते, पण माझे हे समज देखील गैर ठरत आहे. शहरात एकीकडे कायद्याचा गैर वापर करून नवऱ्याला दहशतीत ठेवणाऱ्या बायका आणि दुसरीकडे 'सो कॉल्ड' स्वतः:चा पुरुषाचा माज दाखवत स्त्रियांवर आणि पर्यायाने तिच्या कुटुंबियांवर दबाव टाकणारे राजेंद्र हगवणे आणि कुटुंबियांसारखे नीच लोक देखील दिसतात, हे सत्य स्वीकारणे जरा जड जात आहे.    
 
मी आज पर्यंत महिलांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल परखडपणे व्यक्त झाली आहे. 'ती' ला काय कळतंय? तिचा काय संबंध? तिला येत असते तर एवढे करायची वेळ आली असती का? 'ती' फक्त घर सांभाळायला? लेकरं सांभाळायला...काहींच्या मते नवऱ्याची संपत्ती मग ती वाम मार्गाने आलेली का असेना ती 'किटी पार्टी'मध्ये शो ऑफ करायला सभ्य भाषेत 'चारचौघात मिरवायला' 'ती' असते. स्त्रियांची किंमत कुठेही कितीही केले कमीच दिली जाते पण आपण त्यांचा वाटेल तसा वापर करू शकतो हा विचार आपल्या समाजातून कधी कमी होणार हे देवालाच ठाऊक. 
 
आज पर्यंत माझ्या आयुष्यात अतिशय सक्षम, स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या वेळ प्रसंगी नवऱ्याला खमकी साथ देणाऱ्या स्त्रिया पहिल्या आहेत. त्यामुळे समाजातील अगदी खालच्या स्तरावरील असलेल्या या नीच लोकांचा 'इगो' सुखावयाला देखील आपण थोडेफार जबाबदार आहोत, असे वाटते. लग्न असो किंवा इतर कोणतेही प्रसंग सतत भेटवस्तू  मग ती कोणाची चांगली किती महागडी हे सर्व खरंच महत्वाचे मुद्दे आहेत का ? कोणी किती मोठे लग्न केले काय दिले? सोने चांदी किती दिले काय गरज आहे एवढे वास्तव महत्व देण्याची ? 'आमची मुलगी सुखात नांदते' हे वाक्य हल्ली मुलीच्या आईवडिलांना जास्त महत्वाचे नाही का वाटत? 
 
काही समाजात अजूनही मुलीच्या वडिलांना सर्व संसार देऊन दानाचे महत्व दाखवायचे असते आणि दुसरीकडे होणारा नवरा मी किती मोठा कन्येसाहित हे दान कसे स्वीकारले हे दाखवण्याचा अविर्भाव आणि तो ही घोड्यावर बसून जगाला दाखवत असतो. अशा लोकांच्या लग्नात मला तो नवर देव घोडा नाही तर गाढवा वरून येणारा भिकारीच वाटतो. कसे मी सासऱ्याला लुटले, सगळा संसार 'विथ फ्लॅट' आणि गाडी सकट मिळवला, माझे कर्तृत्व काय ते थोर.... जी मुलगी बिचारी स्वतःचे जन्मजात घर सोडून येते तिलाच घरात सेवेकरी असल्यासारखे ऑर्डरी सोडायच्या. हे कुठल्या सुशिक्षित समाजात स्वीकारले जावे.  
 
या नराधमांचे इगो सुखवायला एका अर्थाने मुलीकडचे देखील जबाबदार असतात असे मला वाटते. कशासाठी एवढा 'शो ऑफ' करायचा कोणाला दाखवले आहे, मुलीला या सर्व गोष्टी फुकट का द्याव्यात? , इतके पांगळे करून मुलीचे पालक तरी काय साध्य करणार आहेत. जुन्या परंपरा या टॅग लाईन खाली किती दिवस चुकीचे नवे पायंडे पडले जाणार आहेत. अगदी आदिम काळात गेलो तरी कुठेही मुलीचा बाप मुलाच्या बापाला एकही वस्तू देत नसे. मुलीचा हात मुलाच्या हातात देण्या व्यतिरिक्त काहीही दिल्याचे उल्लेख भारतीय संस्कृतीच्या आदिमानवाच्या देखील इतिहासात नाहीत.  
 
संस्कृत भाषेत अतिशय सुंदर सुभाषित शिकलेले 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तंत्र देवता रमन्ते' याचा अर्थ असा आहे की, जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता रमतात. आता लग्नात कॅमेरा आणि ड्रोन शूट पुरत्या घरातील लेकी बाळी गोळा करायच्या आणि आनंद टिपायचा. त्या घोळक्यातील किती महिला, मुली या त्यांच्या घरी खऱ्या अर्थाने पूजिल्या जातात हा खरा प्रश्न. दुसरा मतिदार्थ असा की, आज किती घरात मुलींचे सल्ल्ले, त्यांच्या मतांना स्थान दिले जाते, कुठल्या घरात त्यांच्या निर्णयांना खरंच स्वातंत्र्य असते असे तपासून बघण्याची गरज आहे.  
 
आजही कित्येक प्रत्येक घरात स्त्रियांच्या समस्या जाणून न घेता गृहीत धरले जाते. ज्यावेळी स्त्रिया त्यांच्या या प्राथमिक समस्यांमधून बाहेर येतील त्यावेळी समाजात सक्रिय होतील. आजही देशात कित्येक ठिकाणी स्वयंपाक घरातील फॅनच्या सोयी पासून, शौचालयांची उपलब्धता यासाठीचा झगडा कमी होत नाही तोवर स्त्रियांचे भय संपलेलेच नाही असे म्हणावे लागेल.
 
उत्तर-दक्षिण नाही तर एकंदर भारतात हुंड्याच्या प्रथेचे एकेक किस्से ऐकले तरी अंगावर काटा येतो.हुंडा ही एक विषवल्लीच झाली आहे जी लग्नाच्या व्यापारात दोन्ही कुटुंबात पसरतेच. वैष्णवी प्रकरणात सासरचे आणि आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांच्या एक एक मुसक्या बांधल्या जात आहेत. येथे ही राजकारणाची फोडणी असल्यामुळे व्यापक स्तरावर चर्चा होणारच होती. तो सासरा काय फुटकळ पदाधिकारी आहे पुन्हा माज करत फिरणार त्यांचे सुपुत्र भविष्यात थोर राजकारणी किंवा व्यावसायिक होणार. इकडे सगळे आपापल्या कामाला परत.
 
या सर्व प्रकरणावरून आधुनिक महाराष्ट्राची प्रतिमा ही केवळ सोशल मीडिया आणि सोकावलेल्या वृत्तवाहिन्यांच्या चर्चा सत्रांपुरतीच स्तिमित राहिलेली दिसते.  
आपल्या सर्कल मध्ये प्रगतिशील विचारांचे लोक आहेत. आता त्यांच्यातील काहींचे बुरखे माझ्या समोर फाटलेले दिसतात. पण तरी दुसरीकडे स्त्रियांच्या सकारात्मक प्रगतीची आशा कायम आहे. ज्यावेळी देशांत 'वर्किंग वुमन'ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल, ज्या दिवशी आपण हुंडा घेऊन केलेल्या भव्य दिव्य लग्न सोहळ्यांवर बहिष्कार टाकू त्याच वेळी आपण आधुनिक महाराष्ट्राकडे आपली खऱ्या अर्थाने वाटचाल सुरू झाली असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेऊ.   

Related Articles