डॉ. जयंत नारळीकर अनंतात विलीन   

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नारळीकर यांचे मंगळवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले होते. त्यांची कन्या परदेशातून परतल्यानंतर डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयुका येथे डॉ. नारळीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेे होते. येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अरविंद गुप्ता यांसह विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.  
 
वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिव आणल्यानंतर पोलिसांनी मानवंदना दिली. त्यानंतर प्रशासनाकडून नारळीकर कुंटुंबीयांना तिरंगा सुर्पद करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेस पदाधिकारी अभय छाजेड, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, सतिश देसाई यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

बाल विज्ञान केंद्राला बळ मिळणे हीच खरी श्रद्धांजली

विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार तळागाळात झाला पाहिजे, यासाठी डॉ. नारळीकर कायम प्रयत्नशील होते. संपूर्ण जग इंग्रजी लेखनाच्या मागे लागलेले असताना डॉ. नारळीकर यांनी आवर्जून मात्रभाषेत विपुल लेखन केले. तसेच, विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून बाल अन्वेषण विज्ञान केंद्र सुरू केले होते. दर दुसर्‍या शनिवारी पुण्यातील १०० हून अधिक शाळांमधील सुमारे १००० विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आयुका येथे लोकप्रिय विज्ञान व्याख्यान व प्रदर्शन होत असे. हे त्यांचे महत्त्त्वाकांक्षी कार्य अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठातील अभ्यास केंद्राला नारळीकर यांचे नाव 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आयुका यांच्या वतीने एक अभ्यास केंद्र चालवले जात आहे. ज्यामुळे संशोधनाला अधिक चालना मिळत आहे. आगामी काळात या अभ्यास केंद्राला खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे नाव देण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. 

आयुकाकडून श्रद्धांजली सभा

आयुकाचे संस्थापक डॉ. जयंत नारळीकर यांना मानणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक जगभर आहेत. त्यातील अनेकांना अंत्यविधीला येता आले नाही. त्यामुळे आयुकासह विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या सर्व घटकांकडून अभिवादन करण्यासाठी लवकरच आयुका येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली जाणार आहे. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच कळविली जाणार आहे.  
 

Related Articles