आपत्कालीन व्यवस्थापनात समन्वयाचा अभाव   

पुणे : शहरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांत समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा समन्वय वाढविण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले. तसेच प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर एक आपत्कालीन कक्ष सुरु करण्यात आल्याचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी नमूद केले. तसेच कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नसल्याचा दावाही त्यांनी केला.
 
मंगळवारी शहरात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सात नंतर पावसाचा जोर वाढला. यामुळे शहरातील आत्पकालिन व्यवस्थापन यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचे पुढे आले आहे. महापालिका, पीएमआरडीए, जिल्हा प्रशासन, महामार्ग, पोलिस आदी यंत्रणांचा यात समावेश आहे. पाणी तुंबणे, झाडे पडणे, सिमाभिंत पडणे, वाहतुक नियंत्रण दिवे बंद पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे, वाहतुक कोंडी आदी समस्यांचा डोंगरच पुणेकरांवर पडला होता. यासंदर्भात महापालिकेकडून केल्या गेलेल्या उपाययोजनांची माहीती देताना, अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी यंत्रणांमधील समन्वय वाढविण्यात येईल असे स्पष्ट केले. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे ४६ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कक्षामार्फत पाण्याचा निचरा करणे किंवा झाडे हलविणे आदी मदतकार्र्‍यासाठी सुमारे साडे सातशे कर्मचारी रस्त्यावर काम करीत होते.

तक्रारींचे करणार विश्लेषण 

महापालिकेकडे पाणी तुंबण्याच्या आलेल्या तक्रारींमध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या २०१ पैकी किती ‘क्रॉनिक स्पॉट’चा समावेश आहे. नवीन कोणता ‘क्रॉनिक स्पॉट’ तयार झाला आहे का? यासाठी तक्रारींचे विश्लेषण केले जाणार आहे.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरु 

महापालिका प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक अभियंता, एक बिगारी आणि एक सॅनिटरी इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे येणार्‍या तक्रारीनुसार ते पुढील कार्यवाही करणार आहे. मदतकार्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक उपकरणे, मशिन, पंप आदी उपलब्ध करून दिले आहेत.

गटारे परत साफ करणार 

महापालिकेने नाले आणि पावसाळी गटारे साफ सफाई साठी एकुण २६ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. नाले आणि पावसाळी गटारांची अनुक्रमे ७० आणि ६५ टक्के काम झाले आहे. 
 
पाणी तुंबल्यामुळे निर्माण होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जातील. तसेच डोंगराजवळील सीमाभिंत कोसळू नये यासाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापन निधीतून उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच धोकादायक वाडे उतरविणे, तेथील नागरिकांना हलविणे यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल.’’ 

- पृथ्वीराज बी. पी. (अतिरीक्त आयुक्त, पुणे महापालिका )

 

Related Articles