सरकारकडून सरन्यायाधीश गवई यांचा अवमान   

शिष्टाचार न पाळणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करा पटोले यांची मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचा अख्या महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे; पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजप युती सरकार व अधिकार्‍यांनी केला. सरन्यायाधीशांसाठी असलेला शिष्टाचार न पाळून त्यांचा अवमान केला. सरन्यायाधिशांचा अवमान करणार्‍या अधिकार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी केला.
 
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष शिष्टाचार असतो, त्यांच्या दौर्‍याची माहिती आधीच दिलेली असते. पण आम्हाला माहिती नव्हती असे अधिकारी सांगत आहेत, हे पटणारे नाही. सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजप युती सरकारने महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली आहे. सरन्यायाधीश त्यावर गमतीने बोलले, पण तो प्रशासनाला इशारा आहे. तो सरकारला कळला नसेल. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का? असेही पटोले म्हणाले.
 
फुले चित्रपट करमुक्त करा
 
राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल, तर महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा, अशी मागणीही पटोले यांनी केली. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत; पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का? असा सवाल त्यांनी केला.

Related Articles