तर रक्तपात पाहावा लागला नसता : उमर   

श्रीनगर : उशिरा का होईना; पण युद्धविरामाची घोषणा झाली. दोन-तीन दिवसांपूर्वी हा निर्णय झाला असता तर आपल्याला जो रक्तपात पाहावा लागला, तो दिसला नसता. अनेक अमूल्य जीव आपण गमावले. ते जीव वाचू शकले असते. अखेर पाकिस्तानच्या डिजीएमओंनी फोन उचलून आमच्या डिजीएमओंशी चर्चा केली आणि युद्धविराम प्रत्यक्षात आला, असे जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांगितले. 
    
युद्धविरामाला दोन्ही देशांनी संमती दर्शवल्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, युद्धविरामाची जी घोषणा झाली, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. जम्मू आणि काश्मीर सरकार जे जे नुकसान झाले, त्याचा आढावा घेईल. लोकांना नुकसान भरपाई दिली जाईल. जे लोक जखमी आहेत, त्यांच्यावर चांगला उपचार होईल. सरकारी योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत करू. आज सकाळी घोषणा झाल्याप्रमाणे ज्यांचे मृत्यू झाले, त्यांनाही मदत दिली जाईल. मृतांना परत आणता येणार नाही, पण त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची प्रार्थना करू. 
   
पूंछ जिल्ह्याला युद्धाचा वाईट पद्धतीने फटका बसला आहे. राजौरी, तंगधारचे खूप नुकसान झाले. सर्व जिल्हा आयुक्तांना नुकसानाचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बर्‍याच दिवसांपासून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंना पाठवता येत नव्हते. विमानतळ सुरू झाल्यानंतर यात्रेकरूंची पाठवणी करू, असेही उमर म्हणाले.

Related Articles