संरक्षणमंत्र्यांनी घेतला सुरक्षेचा आढावा   

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सेनाध्यक्ष आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पाकिस्तानचा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला सैन्याने गुरुवारी रात्री परतावून लावल्याच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. 
 
सेनाध्यक्ष  अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांचा समावेश होता. अधिकार्‍यांनी भारतीय सैन्य दलांनी केलेल्या कारवाईची माहिती त्यांना दिली. गुरुवारी रात्री जम्मू, पठाणकोट, उधमपूर आणि इतर काही ठिकाणी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानी सैन्याचा प्रयत्न भारताने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने निष्फळ केला होता. 
 
पश्चिम सीमेवरील सुरक्षा परिस्थिती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Articles