पिकांना पोखरणारी विषवल्ली कृषी दहशतवादाचा नवा चेहरा   

दत्तात्रय जाधव 

दहशतवादाशी झुंजणार्‍या अनेक देशांनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत व्यापक बदल केले आहेत. तथापि, दहशतवाद्यांनीही त्यांच्या पद्धती बदलल्या आहेत. तुम्ही राजकीय, वैचारिक, राज्य-पुरस्कृत आणि सायबर दहशतवादाबद्दल अनेकदा ऐकले असेल; पण आता ‘कृषी दहशतवाद’ नव्याने उदयास आला आहे. अमेरिका-चीनमधील तणावादरम्यान पिकांना पोखरणारी विषवल्ली कृषी दहशतवादाचा नवा चेहरा म्हणून समोर आली आहे. अमेरिकेत ‘फ्युझेरियम ग्रॅमिनेरम’ या विषारी बुरशीचा चोरटा व्यापार केल्याबद्दल एका चिनी शास्त्रज्ञाला नुकतीच अटक करण्यात आली. जर ही बुरशी धान्य पिकांमध्ये पसरली असती तर कोरोनापेक्षाही मोठी आपत्ती उद्भवली असती, असा इशारा अमेरिकन शास्त्रज्ञांनी दिला आहे. 

कृषी दहशतवाद म्हणजे काय?

एखाद्या देशातील धान्य पिके नष्ट करण्यासाठी जैविक घटकांचा वापर करणे म्हणजे कृषी दहशतवाद. जैविक घटक पिकांवर हल्ला करतात आणि ते कुजवण्यास सुरुवात करतात. या प्रकारच्या दहशतवादाने संपूर्ण देशात आर्थिक विनाश, अन्न असुरक्षितता आणि दहशत निर्माण केली जाते.  हा कृषी दहशतवाद कमी खर्चाचा, शोधण्यास कठीण असल्याने विरोधकांकडून त्याला पसंती मिळत आहे.

चिनी शास्त्रज्ञाने आणली बुरशी 

चिनी शास्त्रज्ञजुनयांग लिऊ यांनी ‘फ्युझेरियम ग्रॅमिनेरम नावाची धोकादायक बुरशी चीनमधून छुप्या मार्गाने अमेरिकेत आणली. लिऊ हे त्यांची अमेरिकास्थित मैत्रीण युनजिंग जियान हिला भेटायला जात असताना पोलिसांनी लिऊ यांच्यासह अन्य एकाला अटक केली. या दोघांकडून धोकादायक बुरशी जप्त करण्यात आली असून, युनजिंग जियान ही अद्याप फरार आहे. 

‘फ्युझेरियम ग्रॅमिनेरम’ म्हणजे काय?

ही एक धोकादायक बुरशी आहे. त्याच्या प्रसारामुळे पिकांमध्ये रोग पसरतो.  गहू, मका आणि तांदूळ यांसारख्या धान्य पिकांचा यात समूळ नाश होतो. उत्पादन नष्ट करण्याव्यतिरिक्त ही बुरशी व्होमिटॉक्सिन नावाचे विष देखील तयार करते, ते मानव आणि प्राणी दोघांसाठीही घातक ठरू शकते. व्होमिटॉक्सिनमुळे लोकांमध्ये उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि ताप येऊ शकतो. फ्युझेरियम ग्रॅमिनेरम मानवी यकृताला नुकसान पोहोचवू शकते आणि महिलांच्या बाळंतपणातही समस्या निर्माण करू शकते.

चीनशी संबंध तोडण्याचा इशारा

कोणत्याही देशात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. फ्युरियम ग्रॅमिनेरम ही बुरशी चीनच्या प्रयोगशाळेत तयार केल्याचा आरोप करत चीनचे हे कृत्य युद्ध पुकारण्यासारखे आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. या प्रकरणानंतर भविष्यातील धोके टाळण्यासाठी अमेरिकेने चीनशी कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवण्याचा इशारा दिला आहे. 

आर्थिक परिणाम

जागतिक पातळीवर फ्युझेरियम ग्रॅमिनेरममुळे दरवर्षी अब्जावधी डॉलर्सचे शेतीचे नुकसान होते. एकट्या अमेरिकेत १९९० पासून गहू उत्पादक शेतकर्‍यांना या रोगाच्या प्रादुर्भावामुळे अंदाजे ३ ते ४ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.  थेट उत्पादन नुकसानाव्यतिरिक्त मायकोटॉक्सिनची उपस्थिती बहुतेकदा संपूर्ण पिके टाकून देण्यास किंवा दूषित धान्य काढून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करण्यास भाग पाडते. त्यामुळे शेतकरी, निर्यातदार आणि अन्न प्रक्रिया करणारे यांचे आर्थिक नुकसान आणखी वाढते.

बुरशी काही देशांमध्ये अस्तित्वात 

फ्युझेरियम ग्रॅमिनेरम ही बुरशी उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये आधीच अस्तित्वात आहे. शास्त्रज्ञ अनेकदा परदेशी वनस्पती, प्राणी आणि बुरशीचे प्रकार अभ्यासासाठी अमेरिकेत आणतात; परंतु राज्य किंवा राष्ट्रीय सीमा ओलांडून काहीही आणण्यापूर्वी त्यांना काही परवानग्या घ्याव्या लागतात. उदा. परदेशी बुरशीच्या जातीच्या जनुकांचा अभ्यास केल्याने शास्त्रज्ञांना ते उष्णता कशी सहन करते, कीटकनाशकांना किती प्रतिकार करते किंवा उत्परिवर्तन कसे करते याची माहिती मिळते. परवानग्या न घेतल्यास असुरक्षित पीक प्रणालींमध्ये उद्रेक होण्याचा धोका असतो.

शेतीला का केले जातेय लक्ष्य?

लष्करी किंवा वित्तीय प्रणालींपेक्षा, शेती, अन्न प्रक्रिया प्रकल्प आणि पुरवठा साखळ्या कमी संरक्षित आहेत. कोणताही देश आपल्या लष्करी उपकरणे, शस्त्रास्त्रे आणि लष्करी तळांना कडक सुरक्षा देऊ शकतो; परंतु शेतीला सुरक्षित ठेवणे कठीण आहे. पिकांवर होणारे जैविक हल्ले नियंत्रित करणे कठीण होते,  तसेच गुन्हेगारांनाही शोधता येत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला अस्थिर करण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली अस्त्र आहे.

भारतही एकेकाळी शिकार

१९६० च्या दशकात भारतही अशाच एका विषवल्लीचा शिकार झाला होता. गव्हाची प्रचंड टंचाई झाली होती. तेव्हा अमेरिकेतून लाल ज्वारी भारतात पाठवण्यात आली. त्याला त्या काळात ‘मिलो’ असे म्हटले जात असे; पण तो पाठविताना अमेरिकेने चालाखी केली. त्यासोबत विषवल्लीच्या बिया पाठवल्या. त्याला ‘गाजर गवत’ किंवा ‘काँग्रेस गवत’ असे संबोधले जाते. ते एवढ्या झपाट्याने वाढले की, त्याने शेती भरून गेली. त्या गवताला गुरेही तोंड लावत नाहीत. त्याचा नायनाट करणे अजूनही जमलेले नाही.

Related Articles