निवडणूक आयोगाने राहुल यांना फटकारले   

आयोगाची बदनामी करणे मूर्खपणाचे...

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला दावा केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावला आहे. अपेक्षित निकाल न लागल्याने अशा प्रकारे निवडणूक आयोगाची बदनामी करणे मूर्खपणाचे असल्याचे आयोगाने म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले.राहुल गांधी यांच्या लेखावरुन भाजप, संयुक्त जनता दलाने जोरदार टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र निवडणुकीत ‘मॅच फिक्सिंग’ झाली असल्याचा आरोप लेखाद्वारे केला आहे. 
 
आयोगाने राहुल यांचे आरोप अवास्तव व निराधार असल्याचे म्हटले आहे. मतदारांचा निर्णय आपल्या विरोधात गेला म्हणून आयोगाच्या निष्पक्षतेवर संशय घेणे आणि बदनामी करणे हे पूर्णतः गैर व हास्यास्पद असल्याचे आयोगाने म्हटले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली होती. सर्व राजकीय पक्षांचे अधिकृत एजंट मतदान केंद्रांवर उपस्थित होते आणि कुठल्याही वेळी काँग्रेसच्या एजंटांनी कोणतीही तक्रार केलेली नाही, असेही आयोगाने सांगितले. कोणाकडूनही पसरवण्यात येणारी चुकीची माहिती केवळ कायद्याचाच अनादर नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी आहे, असेही आयोगाने म्हटले आहे.

Related Articles